भात आणि पोळीने खरंच डायबिटिज वाढते का?
मधुमेहाचा (डायबिटीज) त्रास असलेले अनेक लोक भात आणि चपाती एकत्र खाणे टाळतात. त्यांच्या मते, या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) वाढू शकते. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, मूळ समस्या हे दोन्ही पदार्थ एकत्र खाण्यात नसून तुम्ही जेवणातून एकूण किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्स (पिष्टमय पदार्थ) घेता यावर अवलंबून असते.
योग्य प्रमाण ठरवून (Portion Control) मधुमेहाचे रुग्ण भात आणि चपाती एकत्र खाऊ शकतात. रक्तातील साखरेवर केवळ दोन अन्नपदार्थांच्या एकत्र येण्याचा नाही, तर एकूण कार्बोहायड्रेट्सचा परिणाम होतो.
अनेक कुटुंबांमध्ये रक्तातील साखर अचानक वाढेल या भीतीने रुग्णांनी नाईलाजाने भात किंवा पोळी या दोन मुख्य अन्नपदार्थांपैकी एकाचीच निवड केली आहे. मात्र, डॉक्टरांच्या मते हा सर्वसामान्यांचा समज वस्तुस्थिती नसून केवळ एक भ्रम आहे.
‘जीव्हीकेलेयर’चे मेडिकल डायरेक्टर आणि ज्येष्ठ डायबेटोलॉजिस्ट डॉ. एन. जी. शास्त्री (MBBS, MDC, FRCP, Dip Diab, DFM) यांच्या मते, समस्या भात आणि पोळी एकत्र खाण्यात नाही. तर जेवताना शरीरात जाणाऱ्या कार्बोहायड्रेट्सच्या एकूण प्रमाणावर रक्तातील साखरेची पातळी ठरते.
डॉ. शास्त्री यांनी स्पष्ट केले की, भात आणि पोळी हे दोन्ही कार्बोहायड्रेट्सचे मुख्य स्रोत आहेत. जेव्हा आपण कार्बोहायड्रेट्स खातो, तेव्हा आपले शरीर त्याचे ऊर्जेसाठी ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. जर दोन्ही पदार्थ मोठ्या प्रमाणात एकत्र खाल्ले, तर शरीरावरील कार्बोहायड्रेट्सचा एकूण भार वाढतो आणि रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. त्यामुळे खरी समस्या प्रमाणाची आहे, अन्नपदार्थांच्या एकत्र येण्याची नाही.
आपल्या पारंपरिक खाण्याच्या सवयी जपत मधुमेह नियंत्रित ठेवू इच्छिणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी हा फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मधुमेहाचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी आवडते अन्नपदार्थ सोडून देण्याची गरज नसते. त्याऐवजी सजगपणे खाणे आणि प्रमाणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
डॉ. शास्त्री यांनी सांगितले की, जर रुग्णांनी दोन्ही पदार्थांचे प्रमाण कमी केले, तर ते एकाच वेळी जेवणात भात आणि पोळी या दोन्हीचा आनंद घेऊ शकतात. भात आणि पोळी एकत्र खाण्यास मनाई करणारा कोणताही वैद्यकीय नियम नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, व्यक्तीने दिवसाच्या ठरवून दिलेल्या कार्बोहायड्रेट्सच्या मर्यादेत राहणे आवश्यक आहे. निरोगी आहार सोपा करण्यासाठी तज्ज्ञ अनेकदा ‘डायबिटीज प्लेट मेथड’ (Diabetes Plate Method) वापरण्याचा सल्ला देतात. हे एक साधे व्हिज्युअल मार्गदर्शक आहे, ज्यामुळे कॅलरी मोजण्याची क्लिष्ट गरज उरत नाही.
आहाराचे योग्य नियोजन कसे करावे?
ताटाचा अर्धा भाग (१/२): तुमच्या जेवणाच्या ताटाचा अर्धा भाग हा बिगर-स्टार्चयुक्त भाज्या, पालेभाज्या आणि सॅलडने भरलेला असावा. डॉ. शास्त्री यांनी स्पष्ट केले, हे पदार्थ शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर देतात, तर कॅलरी अगदी कमी प्रमाणात देतात.
ताटाचा एक चतुर्थांश भाग (१/४): ताटाचा एक चतुर्थांश भाग प्रोटीनयुक्त (प्रथिने) पदार्थांनी भरलेला असावा; जसे की डाळी, पनीर, दही, अंडी, मासे किंवा चिकन. प्रोटीन पचनक्रिया मंदावण्यास मदत करते आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते.
ताटाचा उर्वरित पाव भाग (१/४): ताटाचा उर्वरित पाव भाग कार्बोहायड्रेट्ससाठी राखीव असावा. यात भात किंवा पोळी यापैकी एकाचीच निवड करण्याऐवने रुग्ण दोन्हीचे कमी प्रमाण घेऊ शकतात, उदाहरणार्थ अर्धी वाटी भाताबरोबर एक लहान पोळी.
अन्नाच्या गुणवत्तेची भूमिकाही यात महत्त्वाची असते. पांढरा भात, मैद्याचे पदार्थ, मिठाई आणि गोड पेये यांसारखे रिफाइंड कार्बोहायड्रेट्स शरीरात वेगाने शोषले जातात, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढू शकते.
त्यामुळे फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण वाढवणे फायदेशीर ठरते. डॉ. शास्त्री यांनी सुचवले की, गव्हाची, मल्टिग्रेन किंवा बाजरी-ज्वारीची पोळी जास्त फायबर देते. तर पांढऱ्या भातापेक्षा ब्राउन राईस (Brown Rice) किंवा उकडा भात (Parboiled Rice) हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर पर्याय ठरू शकतात.
शेवटी, मधुमेह व्यवस्थापन म्हणजे अन्नपदार्थांवर बंदी घालणे किंवा पारंपरिक जेवणाबद्दल भीती निर्माण करणे नाही. हा सर्व संतुलनाचा खेळ आहे. डॉ. शास्त्री यांनी पुढे सांगितले की, रुग्णांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, तुम्ही कोणते अन्नपदार्थ एकत्र खात आहात यापेक्षा ते किती प्रमाणात खात आहात हे जास्त महत्त्वाचे आहे. संयम, संतुलित ताट आणि योग्य प्रमाणासह भात आणि पोळी हे दोन्ही तुमच्या निरोगी जीवनशैलीचा भाग राहू शकतात.
महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे (FAQs)
१. मी एकाच जेवणात भात आणि पोळी खाऊ शकतो का?
उत्तर: होय. हे दोन्ही एकत्र खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि ही आपली एक पारंपरिक पद्धत आहे. तुमचे शरीर या दोन्हीकडे ऊर्जेसाठी कार्बोहायड्रेट्स म्हणूनच पाहते.
२. दोन्ही एकत्र खाल्ल्याने वजन वाढते का?
उत्तर: नाही, थेट वजन वाढत नाही. वजन वाढणे हे तुमच्या दिवसभरातील एकूण कॅलरीच्या प्रमाणावर अवलंबून असते, दोन वेगवेगळ्या धान्यांच्या एकत्र खाण्यावर नाही.
३. दोन्हीपैकी एक जास्त फायदेशीर आहे का?
उत्तर: गव्हाच्या पोळीमध्ये सहसा जास्त फायबर आणि प्रोटीन असते, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. तर भात पचायला हलका आणि ग्लूटेन-मुक्त असतो.
४. याचा रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?
उत्तर: पांढऱ्या भातामुळे पोळीच्या तुलनेत रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. दोन्ही एकत्र खाल्ल्याने रक्तातील साखर मध्यम स्वरूपात वाढू शकते, म्हणूनच प्रमाणावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
५. दोन्ही एकत्र खायचे असल्यास योग्य प्रमाण काय असावे?
उत्तर: सर्वात सोपा उपाय म्हणजे तुमच्या नेहमीच्या प्रमाणापेक्षा दोन्ही अर्धे करा. उदाहरणार्थ, पूर्ण प्लेट भात आणि दोन पोळ्यांऐवजी, एक लहान पोळी आणि अर्धी वाटी भात खा.
(टीप – कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
विश्वभारत News Website