✍️मोहन कारेमोरे :
नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसने एबी फॉर्म दिलेला असतानाही पक्षाला टाळून अपक्ष अर्ज सत्यजित तांबे यांनी दाखल केला होता. तांबे यांची कृती राज्यात काँग्रेसचा धाक संपुष्टात आल्याचे लक्षण असून यासंदर्भात त्यांचे मामा ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बाळगलेले कडकडीत मौन म्हणजे तांबे पिता-पुत्रांच्या भूमिकेला अप्रत्यक्षरीत्या दिलेले समर्थनच मानले जात आहे.
या पार्श्वभूमीवर विजयाची घोषणा झाल्यानंतर लगेचच नवनिर्वाचित विधान परिषद आमदार सत्यजित तांबे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार की काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार? असा प्रश्न आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले स्व. राजीव राजळे हेदेखील बाळासाहेब थोरात यांचे भाचे होते. काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा निर्णयदेखील सत्यजित तांबे यांच्यासारखाच धाडसी मानला गेला होता. परंतु तेव्हाही ‘मामा’ या नात्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मौनच बाळगले होते. “प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे’ एवढेच उत्तर त्यांनी त्या वेळीही दिले होते. आता तर त्यांची नेमकी भूमिका काय? याचे गौडबंगाल अद्यापही कोणालाच उलगडलेले नाही. नाशिक पदवीधर विधानसभा विधान परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना बाळासाहेब थोरात यांच्या ज्येष्ठ कन्या डॉ. जयश्री थोरात या आवर्जून सत्यजित तांबे यांना भेटून गेल्या होत्या. त्यामुळे तांबे – थोरात कुटुंबीयांना सत्यजित यांच्या बंडाविषयी निश्चितच पूर्वकल्पना होती. किंबहुना या बंडाला त्यांचे समर्थनही होते, अशीच चर्चा नगर जिल्ह्यात सुरू होती.
थोरात कधी बोलणार?
डॉ. जयश्री थोरात यांचे बंधुप्रेम आणि बाळासाहेब थोरात यांचे मौन या दोन्हीही घटनांचा राजकीय अर्थाने आपापसात संबंध लावायचा म्हटला तर बाळासाहेब थोरात लवकरच पक्षीय राजकारणातून निवृत्ती स्वीकारणार असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संगमनेर मतदारसंघातून डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, अशी जोरदार चर्चा राज्यात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आता बाळासाहेब थोरात काय बोलणार याकडेही लक्ष लागले आहे.
विश्वभारत News Website