राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि साऱ्यांना उत्सुकता आहे ती महापौर कोण होणार याचीच. कोणत्याही निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये मग सर्वोच्च पदासाठी लाॅबिंग सुरू होते. दावेप्रतिदाव केले जातात. पण महापौरपदासाठी लगेचच अशी तयारी सुरू झालेली नाही. त्याचे कारणही तसेच आहे. यामुळे सत्ताधारी पक्षातील इच्छूकांमध्ये घालमेल आहे.
महापौर, नगराध्यक्ष किंवा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सोडतीतून आरक्षण निश्चित केले जाते. सर्वसाधारण पुरुष किंवा महिला, ओबीसी, अनुसूचित जाती व जमाती अशा क्रमाने आरक्षण ठेवले जाते. आधी सर्वसाधारण गटासाठी महापौरपद असल्यास पुढील वेळी हा गट वगळून अन्य प्रवर्गाला आरक्षण दिले जाते. जेणेकरून सर्व गटांना सर्वोच्च पद भूषविण्याची संधी मिळावी हा त्या मागचा उद्देश असतो.
मुंबईत २२७ पैकी भाजपचे सर्वाधिक ८९ तर शिंदे गटाचे २९ असे ११८ सदस्य निवडून आले आहेत. यामुळे भाजपचा महापौर होणार हे निश्चित. पण महापौर कोण होणार ? याचे उत्तर अजून तरी कोणाकडेच नाही. पुण्यात तर भाजपला एकतर्फी यश मिळाले आहे. नागपूरमध्येही तसेच आहे. नवी मुंबईत गणेश नाईक ठरवतील तो महापौर. पनवेलमध्ये तेच आहे. वसई- विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांचा शब्द अंतिम असेल. लातूरमध्ये बहुमत मिळाल्याने काँग्रेसचे अमित देशमुख निश्चित करतील ते नाव, अशी सर्वसाधारण परिस्थिती आहे.
कोणाचे पारडे जड ?
मुंबई, नागपूर, ठाणे , पुणे अशा सर्व २९ महानगरपालिकांमध्ये पारडे कोणाचे जड वा महापौर कोण होणार याचीच चर्चा आता सुरू झाली आहे. पण महापौरपदाचे आरणक्षच अद्याप निश्चित झालेले नसल्याने सर्व महानगरपालिकांंमधील सत्ताधारी पक्षांमधील इच्छुकांना सोडत निघेपर्यंत देव पाण्यात बुडवून ठेवावे लागणार आहेत. साधारपणे महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महापौर किंवा नगराध्यक्षपदासाठी आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढली जाते. महानगरपालिका निवडणुकीसाठी नगरविकास विभागाने तशी सोडततच काढली नाही. परिणामी आजच्या घडीला सर्व २९ महानगरपालिकांमधील महापौरपदचा तिढा कायम राहणार आहे. सोडत काढल्यावर आरक्षण निश्चित होई. त्यांतरच महापौर कोणत्या गटासाठी आरक्षित झाले यानुसार सत्ताधारी पक्षात लाॅबिंग सुरू होईल. बहुधा पुढील आठवड्यात ही सोडत काढली जाईल.
महापौरपदाचा निवडणूक कशी पार पडते ?
महापौरपदाची निवडणूक ही नवीन निवडून आलेल्या सदस्यांच्या पहिल्या बैठकीत होते. महापौरपरांची साध्या बहुमताने निवड होते. उदा. मुंबईत २२७ सदस्य आहेत. पहिल्या बैठकीत उपस्थित व प्रत्यक्ष मतदानात भाग घेतलेल्या सदस्यांच्या संख्येच्या आधारे सर्वात जास्त मते मिळविणारा महापौरपदी निवडून येतो. यामुळे मुंबईत महापौरपदासाठी ११४ हा जादुई आकडा असला तरी प्रत्यक्ष मतदान कमी झाल्यास विजयीसाठी आवश्यक मतांचे प्रमाण कमी होते.
विश्वभारत News Website