भंडारा जिल्ह्यातील खातखेडा या गावातील ईश्वर मोटघरे यांच्यावर हल्ला करून त्यांचा बळी घेतला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहचलेल्या वनाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करून सहायक वनसंरक्षक यशवंत नागुलवार यांच्यासह शैलेश गुप्ता, दिलीप वावरे या वन कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. ग्रामस्थांच्या मारहाणीत गंभीर जखमी तीघांवर नागपूर येथे उपचार सुरू आहे.
शासकीय कामात अडथळा निर्माण करून वनाधिकाऱ्यांना मारहाण करून अन्य वन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी खातखेडा वन विभागाच्या बीट रक्षक संगीता घुगे यांच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी मुन्ना तिघरे, सितकुरा काटेखाये, रवी खातकर, राजकुमार काटेखाये, युवराज मोटघरे यांच्यासह 150 महिला व पुरुषांच्या विरोधात कलम 143, 147, 353, 332, 504, 506 या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
पवनी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा बळी गेला आहे. एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. आठवडाभरात वाघाच्या हल्ल्याच्या दोन घटनांमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. यात सहायक वनसंरक्षक यशवंत नागुलवार, वनपाल वावरे आणि गुप्ता गंभीर जखमी झाले होते.
यापूर्वी 23 जून रोजी पवनी तालुक्यातील गुडेगाव येथे याच वाघाने पहिला बळी घेतला होता. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये रोष होता. अशातच, त्याच वाघाने खातखेडा एसटी बसस्थानकावर आणखी एका गावकऱ्याचा बळी घेतला. यामुळे गावकऱ्यांचा संताप अनावर झाला.