भद्रावती-
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वीज वितरण कंपनीने थकित वीज जोडणी कापण्याचे अभियान सुरू केले आहे. हे अभियान थांबविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी रविवार, 14 मार्च रोजी भद्रावती येथील बसस्थानकालगत असलेल्या बिएसएनएलच्या मनोर्यावर चढून वीरूगिरी केली.
मनोर्यावर चढून इम्रान खान व केतन शिंदे आंदोलन करीत आहेत. भाजयुमोच्या पदाधिकार्यांच्या या आंदोलनाने तालुका प्रशासनात खळबळ उडाली. तहसिलदार यांनी घटनास्थळी भेट देवून आंदोलकांना खाली उतरण्याचे आवाहन केले. पण लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही खाली उतरणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. दरम्यान, हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही आत्मदहन करू, असा इशारा इम्रान खान यांनी दिला. त्यामुळे आता तालुका व जिल्हा प्रशासन आंदोलकांच्या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे आता सार्यांचे लक्ष लागले आहे.
कोरोना प्रादुर्भामुळे टाळेबंदी काळात सामान्य नागरिक, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक बजेट बिघडले. अद्यापही त्यांचे जीवन रूळावर आला नाही. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी सरकारने आधी वाढीव वीज देयक पाठविले. त्यानंतर त्यात सवलत देण्याची फसवी घोषणा केली. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी वीज जोडणी पूर्ववत ठेवण्याची घोषणा केली. आता सरसकट वीज जोडणी कापली जात आहे. या महाविकास आघाडी सरकारच्या घुमजाव करण्याच्या निर्णयाचा आंदोलकांनी निषेध नोंदवला. हे शासन व महावितरण कंपनी सामान्य, गोरगरिबांच्या जीवावर उठली आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, जिल्हास्तरावरील भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यामुळे आता आंदोलनकर्त्यांना बळ मिळाले आहे. तहसिलदार महेश शितोळे यांनी घटनास्थळी भेट दिली. आंदोलकांना खाली उतरण्याची विनंती केली. पण, त्यांनी लेखी आश्वासन द्या, असा हेका धरला. त्यामुळे त्यांची वीरूगिरी सुरूच होती. या आंदोलनाने प्रशासन व पोलिसांची धावपळ उडाली आहे.
थकित वीज तोडणी रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची ‘वीरूगिरी’
Advertisements
Advertisements
Advertisements