जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी केली होती. तसेच मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सशस्त्र दलाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीनंतर पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी भारताकडून लष्करी कारवाई होण्याची भीती व्यक्त केली आहे. या कारवाईबाबतची विश्वसनीय माहिती आमच्याकडे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी एक्स माध्यमावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले की, पुढच्या २४ ते ३६ तासांत पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करण्याचा विचार भारत करत असल्याची आमच्याकडे विश्वसनीय माहिती आहे. पहलगाममधील घटनेत पाकिस्तानचा निराधार संबंध जोडून हा हल्ला करण्याचा विचार भारताकडून केला जात आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मागच्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊले उचलत त्यांची कोंडी केली. तसेच सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान पाकिस्तानने मात्र पहलगाम घटनेपासून स्वतःचे हात झटकले आहेत.
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी करत असताना भारताने नवी दिल्लीतील १०० हून अधिक विदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांना हल्ल्याची माहिती दिली. तसेच जागतिक नेत्यांशीही चर्चा करून याबाबत कळवले.