महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत खळबळजनक दावा करत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यासाठी भाजपमधीलच एक गट सक्रिय झाला असून, या हालचालींची माहिती मुख्यमंत्र्यांनाही आहे, असा दावा पटोले यांनी नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला.
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुरुवातीला मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर बोलताना पटोले म्हणाले की, मुनगंटीवारांचे जे काही सुरू आहे, त्याची पूर्ण कल्पना फडणवीसांना आहे. भाजपमध्ये कुठे-कुठे मुख्यमंत्र्यांविरोधात मोहिम राबवली जात आहे. त्यांना पदावरून हटवण्यासाठी एक गट सक्रिय असून, त्या गटात काय हालचाली सुरू आहेत, हे मुख्यमंत्र्यांनाही ठाऊक आहे. येत्या काळात भाजपमध्ये सत्तासंघर्षाचा मोठा स्फोट पाहायला मिळेल, असेही ते म्हणाले.
सध्या राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रचार जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील सर्व प्रमुख नेते प्रचारात उतरले आहेत. तसेच ठाकरे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे आणि इतर पक्षांचे नेतेही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा वातावरणात पटोलेंच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यावेळी बोलताना पटोले यांनी भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांवरही अप्रत्यक्ष टीका केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिल्याचा उल्लेख करत, इतर ज्येष्ठ नेत्यांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असा टोला त्यांनी लगावला. तसेच विधानसभा अध्यक्षांवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करत, त्यांना बदलण्याची मागणीही पटोले यांनी केली. विधिमंडळाची परंपरा म्हणजे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही न्याय मिळाला पाहिजे,असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या कर्जावरील स्टॅम्प ड्युटी माफीच्या निर्णयावर टीका करताना पटोले म्हणाले की, ही निवडणुकीच्या तोंडावर केलेली घोषणा आहे. ही कर्ज घेण्याची वेळ नाही. आधी हा निर्णय घेतला असता तर शेतकऱ्यांना खरा फायदा झाला असता, असे त्यांनी नमूद केले. पुढे भाजपवर टीका करताना, सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेला आहे. लोकांमध्ये प्रचंड रोष असून त्याचा उद्रेक होईल. हिंदू-मुस्लिम, मराठी-हिंदी असे विषय पुढे करून राजकारण केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
विश्वभारत News Website