वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे घरोघरी कुलरचा वापर वाढला आहे. मात्र, याच कुलरमधील विद्युत प्रवाह एका चिमुकल्यासाठी काळ ठरला आहे. घाटंजी तालुक्यातील शिरोली येथे कुलरला स्पर्श झाल्याने विद्युत धक्का लागून अवघ्या १४ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना आज शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. स्वराज सुरज उले असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शिरोली येथील रहिवासी सुरज उले यांचा मुलगा स्वराज हा सकाळी अंगणात खेळत होता. उन्हाचा कडाका असल्याने घरातील कुलर रात्रभर सुरूच होता. सकाळी स्वराजची आई घरापुढील अंगणात सडा-सारवण आणि स्वच्छतेच्या कामात व्यस्त होती, तर कुटुंबातील इतर सदस्य गाढ झोपेत होते. खेळता खेळता स्वराज घराच्या आत गेला. तेथे सुरू असलेल्या कुलरच्या पाण्याच्या टाकीत त्याने सहज हात टाकला. कुलरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे विद्युत प्रवाह उतरला होता. पाण्याचा स्पर्श होताच स्वराजला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो जागीच कोसळला. काही वेळाने आईच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. तात्काळ घरातील वीजपुरवठा खंडित करून स्वराजला बाहेर काढण्यात आले. कुटुंबीयांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
अवघ्या १४ महिन्यांच्या स्वराजच्या जाण्याने उले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात काळाने घाला घातल्याने शिरोली गावावर शोककळा पसरली असून, संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वराजच्या या दुर्दैवी मृत्यूने घरगुती उपकरणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडून अशा घटना टाळण्यासाठी विद्युत उपकरणांच्या वापराबाबत जनजागृती करण्याची मागणी होत आहे.
नागरिकांना खबरदारीचे आवाहन
उन्हाळ्यात कुलरचा वापर करताना नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले. अनेकदा कुलरच्या मोटारमध्ये किंवा वायर्समध्ये बिघाड झाल्याने लोखंडी टाकीत विद्युत प्रवाह उतरतो. त्यामुळे कुलरला नेहमी ‘अर्थिंग’ आहे की नाही याची खात्री करावी, लहान मुले घरात असतील तर कुलरभोवती संरक्षक जाळी किंवा लाकडी कुंपण असावे, पाणी भरताना किंवा कुलरची स्वच्छता करताना स्विच बंद करून प्लग बाहेर काढावा, शक्य असल्यास ‘प्लास्टिक बॉडी’ असलेल्या कुलरचा वापर करावा किंवा जुना कुलर वेळीच इलेक्ट्रिशियनकडून तपासून घेणे आवश्यक झाले आहे.
विश्वभारत News Website