पांढऱ्या सोन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्याचं सोनं होण्याची आशा दिसत आहे. नगदी पीक असलेल्या कापसाला मागील वर्षाचा हंगाम संपताना 14 हजारांवर भाव मिळाला होता. यावर्षीही कापसाचं पीक शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा किरण घेऊन आलं आहे.
यावर्षी हरियाणा राज्यातील पालवाल जिल्ह्यात या हंगामातील नवीन कापसाची आवक सुरु झाली आहे. इथे कापसाला 10 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. हरियाणा आणि पंजाबच्या इतर भागात सप्टेंबरपासून नवीन कापसाची आवक वाढेल. यामुळे महाराष्ट्रातही या हंगामात कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी आहे.
भारतात कापूस लागवड 6.65 टक्क्यांनी वाढली आहे. देशात नवीन कापूस साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात मार्केटमध्ये येतो. यावेळी मात्र ऑगस्टमध्ये कापसाचे भाव आठ टक्क्यांनी वाढले होते. भविष्यात कापसाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या 500 गाठींपेक्षा कमी कापूस बाजारात दाखल झाला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या कापसाची किंमत जवळपास दुप्पट आहे. नवीन कापसाला 9 हजार 900 ते 10 हजार रुपये भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या कालावधीत कापसाचा सरासरी भाव 5 हजार रुपये होता. भविष्यात कापसाचा भाव 45 हजार ते 47 हजार रुपये प्रति गाठी असेल असं तज्ज्ञांचं मत आहे.
बाजारात कापसाची आवक वाढल्यानंतर भाव 35 हजार रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. मात्र त्यानंतर पुन्हा दरात सुधारेल असा अंदाज आहे. तर कापसाच्या भाववाढीचा फायदा सर्वच शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने धोरण राबवण्याची मागणी शेतकरी करत आहेत.