चाळीसगाव तालुक्यातील जामदा येथे ग्रामस्थांसह महिलांचा तीव्र संताप पाहायला मिळाला. अनेक दिवसांपासून गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करूनही कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा संपल्यानंतर सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांना कोंडून कार्यालयाला कुलूप ठोकले.
जामदात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनकडून होत आहे. गावातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करीत होते. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ग्रामसभा बोलावण्यात आली. त्यातच गावाच्या विकासाच्या प्रश्नांसह अंगणवाडीच्या जागेचा व अवैध धंदे बंद करण्याबाबतचा मुख्य विषय ऐरणीवर होता.