रवीना टंडन सध्या तिच्या ‘पटना शुक्ला’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती वकिलाची भूमिका साकारत आहे. रवीना तिच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. प्रमोशनदरम्यान, रवीनाने अक्षय कुमारसोबतच्या ब्रेकअपबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच नातं तुटल्यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या वृत्तावरही अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.
रवीना टंडन २० वर्षांहून अधिक काळानंतर अक्षय कुमारबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटात दोघेही एकत्र काम करत आहेत. “खूप सारी नाती तुटतात आणि लोक आयुष्यात पुढे जातात, पण मैत्री संपत नाही. कदाचित आपण जोडीदार म्हणून एकमेकांसाठी योग्य नव्हतो, असं लक्षात येतं. यात मोठं काय आहे? मला खरंच कळत नाही. मी ते नातं तुटलं तरी ठिक होते. पण मीडियाने खूप मोठा गोंधळ निर्माण केला कारण त्यांना त्यांची मॅगझिन विकायची होती,” असं मोजो स्टोरीला दिलेल्या मुलाखतीत रवीना म्हणाली.
“माझ्यासाठी फक्त माझे कुटुंब आणि मित्र काय विचार करतात, ते महत्त्वाचं आहे. एकवेळ अशी येते जेव्हा लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याचा मला फरक पडत नाही,” असं रवीना म्हणाली. तसेच साखरपुडा मोडल्यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या अफवांचा तिला काहीच फरक पडत नसल्याचं ती म्हणाली.
“ज्या प्रकारच्या गोष्टी माझ्या आजूबाजूला बोलल्या जात होत्या, त्यावर माझं नियंत्रण नव्हतं. ज्या दिवशी मी माझ्या दोन मुलींना घरी आणलं तेव्हा मला वाटलं की त्यांना तसं आयुष्य मिळत नाहीये, जसं मिळायला हवं. मला वाईट वाटत होतं. माझ्या घराजवळच हे घडत होतं, त्यामुळे मी जबाबदारी घेण्याचं ठरवलं. मी २१ वर्षांचे झाले त्यादिवशी मी त्यांना घरी आणलं,” असं रवीना म्हणाली.
साखरपुड्यानंतर अक्षयने रवीनाची फसवणूक केली होती, त्यामुळे या दोघांचा साखरपुडा मोडला, असं म्हटलं जातं. त्यानंतर अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाशी लग्न केल, तर रवीनाने चित्रपट वितरक अनिल थडानीशी लग्न केलं.