भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली माहिती
करोना हे फक्त भारतातलंच नाही तर जगापुढचं आरोग्य संकट झालं आहे. अशात करोना व्हायरसचा प्रतिबंध करणाऱ्या लशींवर काम सुरु आहे. जगातल्या विविध देशांमध्ये ही प्रक्रिया सुरु आहे. भारतही यामध्ये मागे नाही. भारतात तीन लशी या क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहेत अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे. कॅडिला आणि भारत बायोटेक यांनी पहिल्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहेत. तर सिरम इन्स्टिट्युटने फेज २ B3 चाचणी पूर्ण केली आहे. सिरमने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु केली आहे अशी माहितीही डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे.
अमेरिका आणि युरोपातल्या काही देशांमध्ये करोनाची साथ मोठ्या प्रमाणावर आली होती. त्यानंतर ती हळूहळू कमी झाली होती. त्यानंतर तिथे दुसरी करोना संसर्गाची दुसरी लाट आली. आपण यातून शिकलं पाहिजे. आपण पहिल्याच लाटेच्या वेळी लॉकडाउनची अमलबजावणी कठोर पद्धतीने केली. नाहीतर आपणही सांगू शकलो नसतो की करोनामुळे किती मृत्यू होतील. आपण चांगल्या उपाय योजना केल्याने आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणावर हा संसर्ग पसरला नाही असंही डॉ. बलराम भार्गव यांनी सांगतिलं.