संचारबंदी मोडणार्या नागरिकांवर मूल प्रशासनाची कारवाई
– 136 जणांची केली कोरोना चाचणी
मूल-
तालुक्यात सातत्याने कोरेानाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले असले, तरी नागरिक रस्तावर फिरताना दिसतात. मात्र, प्रशासनाने रविवार, 25 एप्रिलपासून विनाकारण फिरणार्या व संचारबंदी मोडणार्या नागरिकांवर धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत विनाकारण घराबाहेर पडणार्या 136 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आल्याने शहरातील मुख्य रस्ते आता सामसूम पडल्याचे चित्र दिसत आहे.
शासनाच्या निर्देशांचे पालन न करता अनेक नागरिक विनाकारण मोठया प्रमाणात ये-जा करीत आहेत. तसेच ‘मॉर्निंग वॉक’च्या नावाखाली फिरताना दिसून येत आहेत. यावर आळा बसावा म्हणून मूलच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनने सुरू केलेल्या मोहिमेमुळे आता मूल येथील नागरिकांनी ये-जा कमी झाली आहे. यावर टाळेबंदी लॉकडाऊन असताना विनाकारण वारंवार बाहेर फिरणार्यांवर पायबंद घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व उपविभागीय पोलिस अधिकारी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासन व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड तपासणी करण्याची योजना आखली. रविवारी सकाळी राबविलेल्या या मोहिमेत विनाकारण फिरणार्या 136 नागरिकांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. यात 6 जण बाधित आढळले.
या 6 जणांना पकडून कोरोना चाचणी केली नसती, तर त्यांनी मूल शहरात कोरोना पसरविला असता व त्यामुळे अनेकजण बाधित झाले असते. आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने केलेल्या या धडक कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या धडक मोहिमेत तहसिलदार डॉ. रवींद्र होळी, पोलिस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, गटविकास अधिकारी डॉ. मयूर कळसे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, नायब तहसिलदार यशवंत पवार आदींनी गांधी चौक, चामोर्शी नाका, कर्मवीर महाविद्यालय परिसर, सावली व सिंदेवाहीकडे जाणारा उमानदीजवळील चौक व परिसरातील रस्त्यांवर कडक बंदोबस्त ठेऊन नाकेबंदी केली व विनाकारण ये-जा करणार्यांवर चाप बसविला. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी रहदारी खुली केली. नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनानी केलेल्या या धडक कारवाईमुळे त्यांचे कौतुक होत आहे.
संचारबंदी मोडणार्या नागरिकांवर मूल प्रशासनाची कारवाई – 136 जणांची केली कोरोना चाचणी
Advertisements
Advertisements
Advertisements