विश्व भारत ऑनलाईन :
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शरद पवार यांच्यावर तिखट टीका केली आहे. “निवडणूक आयोगाचा हा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अपेक्षित होता. शिवसेनेच्या या परिस्थितीला शरद पवारच जबाबदार आहेत”, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
दोनच दिवसांपूर्वी त्यांनी ‘जो निर्णय येईल, त्याचे स्वागत केले पाहिजे,’ असं एक वक्तव्य केले होते. त्यामुळे हे मोठे लोक कुठे काही गेम करतील, सांगता येत नाही. शिवसेना संपवायला शरद पवारच जबाबदार आहेत. सगळा दोष पवारांचा आहे, यातून त्यांना स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
विधानसभेची २०१४ ची निवडणूक झाल्यानंतर पवार यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तो पाठिंबा म्हणजे पवारांचा एक कट होता. शिवसेना-भाजपचा संसार पवार यांना चालू द्यायचा नव्हता. पवार यांनी कधीच शिवसेनेशी जुळवून घेतले नाही. पवार यांची मैत्री हिंदूह्रदयसम्राट यांच्याशी असली तरी राजकीय मतभेद होतेच. उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना संपवत पवार यांच्याकडे जाऊन बसले.पवार राज्याच्या राजकारणातील बरमूडा ट्रँगल आहेत. त्यांच्याजवळ गेलेले सगळे संपले आहेत, हा इतिहास आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०१९ मध्ये एकही उमेदवार नसताना राज ठाकरे यांना पुढे करत ‘लाव रे तो व्हीडीओ’ म्हणायला लावले. गरज संपली की त्यांना झटकून टाकले, असेही शिवतारे यांनी नमूद केले.