विश्व भारत ऑनलाईन :
मोबाईल आणि माणूस जणू काही एकमेकांशिवाय जगूच शकत नाही, असे आजच्या काळात दिसते. पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलने अचानक पेट घेतल्याने एका तरुणाचा पाय भाजल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील सौंदळ पुनर्वसन येथे अलीकडेच घडली. वेळीच उपस्थितांनी खिशातून पेटता मोबाईल काढल्याने मोठा अनर्थ टळला.
सौंदळ पुनर्वसन येथील अंकित विश्वनाथ भुते (वय 25) असे किरकोळ जखमी तरुणाचे नाव आहे.
नेमके काय झाले?
अंकित नेहमीप्रमाणे आपला मोबाईल पँटच्या खिशात ठेवला होता. गावात असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थिती दर्शविण्यासाठी रस्त्यावरून जात असताना त्याच्या खिशातील मोबाईलने अचानक पेट घेतला. हा प्रकार पाहून ग्रामस्थांनी धाव घेत त्याच्या खिशातून पेटता मोबाईल काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. त्याला तत्काळ अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. यात त्याचा पाय भाजला असून पॅन्टचा काही भाग जळाला आहे. त्याच्यावर उपचार केल्यानंतर सायंकाळी अंकितला सुटी देण्यात आली आहे.
असे प्रकार टाळता येतील
मोबाईलमध्ये लिथियम व पॉलीमर असते. ओवर चार्जिंगने ते हिट होते. त्यामुळे बॅटरी फुलून ब्लास्ट होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे केवल दोन तास मोबाइल चार्ज करणे. प्रॉपर मोबाइल चार्जर वापरणे. मोबाइल चार्जिंग होताना हिट होत असेल तर वेळीच मोबाइल केयरला भेट देणे आदी उपाय केल्यास असे प्रकार टाळता येतो, असे मोबाइल तज्ज्ञ सांगतात.