महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असल्याने सर्वच पक्ष वाजतगाजत कामाला लागल्याचे दिसून येत आहे. बैठकांना उधाण आले असून काही इच्छुक उमेदवार तिकीट पक्के झाल्याचा दावा करीत आहेत. पण हेच हेरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा उत्साही संभाव्य उमेदवारांचे कान टोचले. आर्वी व धामणगाव या दोन विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्यास ते आले होते. आर्वीत बोलताना त्यांनी इच्छुकांना खडेबोल सुनावले.
बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
स्पष्ट केले की, माझे तिकीट पक्के, असा दावा जर कोणी करीत असेल तर तो फोल समजा. छातीठोकपणे असा दावा करू नये. एकही तिकीट पक्की नाही, असे समजा. आम्ही वरिष्ठ काय करायचे ते पाहून घेऊ, असा इशारेवजा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. तसेच ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मागे का पडलो, याचा विचार करीत कामाला लागा. आता प्रत्येक बुथवर किमान २० ते २५ मते वाढतील याचे नियोजन करा. लोकसभा निवडणुकीत संविधान मुद्दा मारक ठरेल, असे वाटले नव्हते. म्हणून पक्ष ठरवेल त्याप्रमाणे कार्य करावे लागेल.
पदाधिकाऱ्यांच्या भावना काय?
या खास बैठकीत नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. निवडक पदाधिकाऱ्यांना बोलण्याची संधी मिळाली. पक्षाच्या बैठकाच खूप होतात. त्यातच वेळ जातो. फिल्डवर काम करायला वेळच मिळत नाही. म्हणून काम कमी व चिंतनच अधिक असा प्रकार टाळला पाहिजे, अशी भावना व्यक्त झाली.
इशारा नेमका कोणासाठी?
माजी खासदार रामदास तडस, आमदार दादाराव केचे, लोकसभाक्षेत्र पक्षप्रभारी सुमित वानखेडे, सुधीर दिवे, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. मात्र, या बैठकीत बावनकुळे यांनी दिलेला इशारा कुणास होता, हे लपून राहिले नाही. कारण तो रोख ओळखता आल्याने ‘समझनेवाले को इशारा काफी है,’ असे म्हणत पदाधिकारी बाहेर पडले होते, अशी माहिती बैठकीस उपस्थित एका नेत्याने दिली. मौदा-कामठी मतदार संघाचे आमदार टेकचंद सावरकर यांची धाकधूक वाढली आहे.
आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे विद्यमान आमदार दादाराव केचे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे हेच दोघे प्रबळ दावेदार आहेत. यापैकी कोण, यांच्या उत्सुकतेत येथील भाजपा पदाधिकारी आहेत. विद्यमान आमदार असल्याने केचे यांनाच उमेदवारी मिळेल, असे केचे समर्थक उघड बोलत असल्याचे म्हटल्या जाते. मात्र केचे व वानखेडे समर्थक तयारीत असल्याची चर्चा होते.