विश्व भारत ऑनलाईन :
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काहीतरी वादग्रस्त आणि अजब विधान करून नेहमी चर्चेत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशातून आणलेल्या चित्त्यांमुळे गायींमध्ये लम्पी आजार पसरला आहे. चित्त्यांच्या अंगावरील ठिपके आणि लम्पी आजारामुळे गायीला येणारे ठिपके सारखेच आहेत, अशा आशयाचं विधान नाना पटोले यांनी केलं. पटोलेंच्या या विधानानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली आहे.
बावनकुळे काय म्हणाले?
“मोंदींनी नायजेरीयावरून चित्ते आणल्याने देशात लम्पी आजार पसरला. चित्यांच्या अंगावर जसे ठिपके दिसतात, त्याप्रमाणे देशात गायीच्या अंगावर ठिपके आहेत, असा आरोप नाना पटोलेंनी केला. मागच्या दोन-चार महिन्यांमध्ये नाना पटोले ज्याप्रमाणे बोलत आहेत. त्यावरून असं दिसतं की, नाना पटोले यांनाच लम्पी आजार झाला आहे. त्यांनाच चांगल्या डॉक्टरांकडे पाठवण्याची गरज आहे. त्यांचा आजार तपासून घेण्याची गरज आहे” अशा शब्दांत बावनकुळेंनी टीकास्र सोडलं आहे. नागपुरमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
तसेच महाराष्ट्रातील वातावरण खराब करणे, देशाच्या पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह बोलणे, हे नाना पटोले केवळ प्रसारमाध्यमांत प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतात. राहुल गांधींच्या अत्यंत जवळ जाण्यासाठी आणि आपलं अध्यक्षपद टिकवण्यासाठी ते अशा पद्धतीने बोलतात. त्यामुळे माझा नाना पटोलेंना सल्ला आहे, त्यांना लम्पी आजार झाला असेल तर डॉक्टरांकडून तपासून घ्यावा, अशी टीका बावनकुळेंनी केली.