विश्व भारत ऑनलाईन :
नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कुही, भिवापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. राज्यातील विविध 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमध्ये निवडणूक पार पडेल. एकूण 1 हजार 165 ग्रामपंचायतींसाठी या निवडणूक होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात निवडणुका?
यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता आजची ग्रामपंचायत निवडणूक ही महत्त्वाची आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे एकत्रित महाविकास आघाडीचे सरकार होते. पण राज्यात आजच्या घडीला शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपचे एकत्रित सरकार आहे. राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनाचा ग्रामपंचायत निवडणुकीत खरंच परिणाम होतो का? ते पाहणे महत्त्वाचे आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती जागा मिळतात, याकडेही लक्ष असेल.