गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून योग्य उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. या प्रक्रियेत तिकीट मिळण्याची शक्यता नसलेल्या सर्वच पक्षातील नेत्यांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. याच कारणामुळे मागील तीन दशकांपासून भाजपामध्ये असलेले तसेच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद भुषवलेले जय नारायण व्यास यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. काँग्रेस किंवा आप पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
व्यास मागील ३० वर्षांपासून भाजपात होते. या काळात त्यांना मोदी तसेच केशुभाई पटेल यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळाले होते. मात्र पक्षाकडून तिकीट नाकारले जाण्याची शक्यता बळावताच त्यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते आगामी काळात गुजरात किंवा आप पक्षात जाण्याची शक्यता आहे. व्यास हे उच्चशिक्षित आहेत. त्यांनी आयआयटी मुंबईमधून शिक्षण घेतलेले आहे. अर्थशास्त्राचे त्यांना उत्तम ज्ञान आहे. त्यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा देताना कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. राजीनाम्यात त्यांनी वैयक्तिक कारणामुळे मी राजीनामा देत आहे, असे नमूद केले आहे.
व्यास यांनी १९९८ आणि २००० साली पाटण जिल्ह्यातील सिधपूर विधानसभा मतदासंघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. यावेळी त्यांना याच जागेवरून निवडणूक लढवायची आहे. मात्र २००२, २०१२, २०१७ साली त्यांना या मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. २००२ आणि २०१७ याच मतदारसंघातून बलवंतसिंह राजपूत यांनी काँग्रेसच्या तिकिटावर व्यास यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे राजपूत आता भाजपात आहेत.
व्यास यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्यास पक्षावर नाराज नव्हते. दोन वेळा पराभूत होऊनही त्यांना पक्षाने तिकीट दिले होते. त्यांनी मंत्री म्हणून काम केलेले आहे. ते एक प्रभावशाली नेते आहेत. मात्र वयाचे ७५ वर्षे झाल्यानंतर भाजपातर्फे त्यांना तिकीट दिले जाणार नाही, याची त्यांना भीती असावी, असे पाटील यांनी सांगितले.