बॉलिवूडमध्ये एक कलाकार म्हणून चांगले चित्रपट मिळणेही आवश्यक असते.त्याचबरोबर तेवढ्या ओळखी, तशी नाती, मैत्री आणि आपली ओळख कायम टिकवून ठेवणे हे खूप मोठे आव्हान असते. कलाकारांना आपल्या अस्तित्वाची लढाई द्यावी लागते. कामातले वेगळेपण, स्पर्धा, चित्रपट आणि आगळ्यावेगळ्या भुमिका यातून कलाकाराला स्वत:ला सिद्ध करायचे असते. त्यामुळे प्रत्येक क्षण कलाकारांसाठी हा खूपच महत्त्वाचा ठरतो. त्यातून सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपलं अस्तित्व टिकवून ठेवणे हे तर त्याहूनही कठीण. परंतु अशा अनेक कलाकारांनी आपल्या वाटेत आलेल्या सगळ्याच अडचणींना पार केले असून त्यांनी या क्षेत्रात उज्ज्वल नावही कमावले आहे.
त्यातील असाच एक कलाकार आहे ज्याचं नावं ऐकलं की सगळ्यांच्याच मनात एक आदरयुक्त भिती निर्माण होते. कधी काळी हा कलाकार चुनाभट्टीला 8 किलोमीटर पायी चालत जायचा आणि सिनेमांचे पोस्टर रंगवायचा. अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यामुळे त्याची चित्रपटसृष्टीत एन्ट्री झाली आणि आज हा कलाकार बॉलिवूडमधला टॉपचा अभिनेता ठरला आहे. आज या अभिनेत्याला कोण नाही ओळखत. यांचे नाव आहे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर. तुम्हाला नाव ऐकून आश्चर्य वाटले असेल. हो, नाना पाटेकर यांनी आपल्या आयुष्यात खूप स्ट्रगल पाहिला आहे आणि अपार कष्ट करून आज ते बॉलिवूडमधील सर्वांत नावाजलेले कलाकार आहे.
आज नाना पाटेकर हे 72 वर्षांचे आहेत परंतु इतक्या वर्षातही त्यांचा दरारा हा काही कमी झालेला नाही. नटसम्राट, डॉ. प्रकाश बाबा आमटे अशा चित्रपटांतून त्यांनी आपला कसदार अभिनयानं प्रेक्षाकांची मनं जिंकून घेतली होती. क्रांतीवीर, तिरंगा, सलाम बॉम्बे, वेलकम अशा अनेक हिंदी चित्रपटांतूनही त्यांनी आपल्या वाटेला आलेल्या भुमिका अक्षरक्ष: गाजवल्या आहेत.
नाना पाटेकर यांचा संघर्ष काही सोप्पा नव्हता. त्यांनी लहान वयातच काम करायला सुरूवात केली होती. वयाच्या तेराव्या वयापासून त्यांनी आपल्या कुटुंबियांचे उदरभरण व्हावे म्हणून चित्रपटांचे पोस्टर रंगवयाला सुरूवात केली होती त्यासाठी ते 8 किलोमीटर पायी चालत चुनाभट्टीला जायचे.
स्मिता पाटीलमुळे नानांची एन्ट्री?
नाना पाटेकर यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की ते स्टेज करण्यातच खूप व्यस्त आणि आनंदी होते त्यातून स्मिता पाटील ही त्यांची चांगली मैत्रीण होती. स्मिता पाटील यांनी चित्रपटात काम करण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरला. स्मिता पाटील यांनी नाना पाटेकर यांचे नावं आज की आवाज या चित्रपटासाठी रवि चोप्रा यांना सुचवले होते.
नाना पाटेकरांना आपल्या अभिनयाची सुरूवात 1978 साली आपल्या गमन या चित्रपटातून केली. चार दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या नाना यांनी आपले सर्व रंग प्रेक्षकांसमोर मांडले आहेत. गंभीर व्यक्तिरेखा असो वा कॉमिक, रोमँटिक असो की नकारात्मक, त्यांनी केलेल्या प्रत्येक भूमिकेत त्यांना खूप पसंती मिळाली. परंतु त्याला खरी ओळख मिळाली ती परींदा या चित्रपटातून. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांना आत्तापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटातून कामं केली आहेत. इतके मोठे स्टार असले तरी नाना पाटेकर हे खूप सर्वसामान्य आयुष्य जगतात.