कॉंग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. कॉंग्रेस नेत्यांनी त्याचे खंडन करत ते कुठेही जाणार नसल्याचे सांगितले. मात्र, कमलनाथ यांच्या बालेकिल्ल्यातील 50 हून अधिक काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री मोहन यांनी या नेत्यांचे पक्षात स्वागत केले आहे. तसेच, कॉंग्रेसला इशाराही दिला आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीमध्ये एक दोन नव्हे तर ५० हून अधिक काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ‘काँग्रेस आणि इतर पक्षांच्या लोकांची मने डळमळीत झाली आहेत. आज नाही तर उद्या ते आमच्या कुटुंबात सामील होतील. काही आज येतील आणि काही उद्या येतील. येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत आहे. कारण आपल्याला भारताची सेवा करायची आहे. मुख्यमंत्री मोहन यांच्या ‘काही आज येतील आणि काही उद्या येतील.’ या विधानाचा रोख कमलनाथ यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बालाघाट आणि छिंदवाडा येथे भेट दिली. छिंदवाडा येथे पोहोचण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बालाघाटमध्ये 761.54 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, यावेळी होळी आणि महाशिवरात्रीमुळे 1 मार्च रोजी लाडक्या भगिनींच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.