देसाईगंज येथील एका बड्या तांदूळ व्यापाऱ्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने राईस मिलर्सकडून कोट्यवधींची वसुली केल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांनी मंगळवारी विधानसभेत केला. आकाश अग्रवाल या व्यापाऱ्याने पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून संपूर्ण जिल्ह्याला वेठीस धरले असून, शासकीय धानाचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असल्याचा दावा पटोले यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात केला.
सभागृहाचे लक्ष वेधताना नाना पटोले म्हणाले की, संबंधित व्यापाऱ्याकडे ‘अरवा’ तांदूळ तयार करण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. असे असतानाही केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून ‘उसणा’ तांदूळ तयार केला जातो, जो सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी नियमानुसार ग्राह्य धरला जात नाही. तरीही शासकीय धानाची उचल करून तो तांदूळ खुल्या बाजारात चढ्या दराने विकला जात आहे. पुरवठा विभागाने या व्यापाऱ्याला दोनदा रंगेहात पकडूनही त्याच्यावर ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल करत पटोले यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली.
मंत्रालयातील भ्रष्ट साखळीवर ताशेरे
राज्यातील गोरगरिबांना रेशन दुकानांमार्फत दिला जाणारा तांदूळ पौष्टिक असण्याऐवजी अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप पटोले यांनी केला. राईस मिलर्स आणि पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा मोठा भ्रष्टाचार सुरू असून, याकडे मंत्री छगन भुजबळ यांचे लक्ष वेधत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक धानाची भरडाई करून तोच तांदूळ वाटणे अपेक्षित आहे. मात्र, अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे लगतच्या आंध्रप्रदेशातून निकृष्ट तांदूळ स्वस्तात आयात केला.
शासनाकडून मिळालेला दर्जेदार धान खुल्या बाजारात वळवून, त्याऐवजी आयात केलेल्या निकृष्ट तांदळाला वारंवार पॉलिश करून रेशन दुकानांमार्फत वितरित केले जात असल्याचे विदारक वास्तव त्यांनी मांडले. कधी राष्ट्रवादी, कधी काँग्रेस, तर कधी भाजपच्या नेत्यांशी संधान साधून मंत्रालयातील कामे पदरात पाडून घेणे, हा अग्रवाल याचा जुनाच हातखंडा आहे. याच बळावर त्याने भाजपच्या एका माजी आमदाराच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
कुपोषण आणि मृत्यूचे भीषण वास्तव
या निकृष्ट अन्नामुळे राज्यात, विशेषतः गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. कुपोषणामुळे सुमारे दोन हजार बालकांचा आणि अनेक गर्भवती महिलांचा मृत्यू झाला असल्याचा धक्कादायक दावा पटोले यांनी केला. अनेक वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदल्या का केल्या जात नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दिवंगत उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली
गोंदियाचे जिल्हा पुरवठा अधिकारी आगळे यांच्या भ्रष्टाचाराबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी त्यांच्या बदलीचे आदेश दिले होते. मात्र, मंत्रालयातील काही बड्या अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत आगळे यांना त्याच ठिकाणी दुसरी जबाबदारी दिली आणि त्यांच्या जागी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आघाव पाटील यांची नियुक्ती केली. अजित पवार आता हयात नाहीत, पण त्यांनी सभागृहात दिलेला शब्द सरकार पाळणार का, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला आहे.
विश्वभारत News Website