- कंगना राणावत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राज्यात राजकीय वाद निर्माण झाला होता. शिवसेनेनं कंगना राणावत हिच्या विरोधात आघाडी उघडली होती. कंगना व तिचे समर्थकही ठाकरे सरकारवर टीका करत होते. त्याच दरम्यान निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे एक व्यंगचित्र सोशल मीडियात शेअर केले. त्यामुळं संतापलेल्या शिवसैनिकांनी मदन शर्मा यांना गाठून मारहाण केली होती. माजी सैनिकाला झालेल्या मारहाणाची हा मुद्दा उचलत विरोधी पक्ष भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. त्यानंतर शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन लगेचच जामिनावर सोडून दिले.
शिवसैनिकांच्या सुटकेवर भाजपनं जोरदार आक्षेप घेतला आहे. ‘मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याची कबर वाचविणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवला गेला. पोलिसांच्या लेखी कबर वाचवणं हा गंभीर गुन्हा होता. पण, देशप्रेमी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मांना यांना मारहाण झालेली मारहाण हा साधा गुन्हा म्हणून नोंदवला गेला. हल्लेखोरांना जामिनावर सोडले गेले. वा रे वा!, असं म्हणत आमदार आशिष शेलार यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ‘महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनं विवेकबुद्धी गहाण ठेवली आहे काय? हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी,’ असा बोचरा सवाल शेलार यांनी केला आहे.