रेमडेसीवर लस होणार वर्ध्यात तयार!
वर्धा-
राज्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना रेमडेसीवीर लसीचा प्रचंड तुटवडा राज्यात जाणवू लागला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रेमडेसीवर लस तयार करणार्यांच्या नावांचा शोध घेतला असता वर्ध्यातील औद्योगिक वसाहतीतील ‘जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रा.लि. या कंपनीचे नाव पुढे आले. कागदपत्रांची पूर्तता आणि कच्चा मालाची जुळवाजुळव झाल्यानंतर त्वरित लस उपलब्ध करून देण्याचा आमच्या कंपनीचा प्रयत्न असेल अशी माहिती कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी तरुण भारतसोबत बोलताना दिली. लस निर्मितीनंतर वर्धेतून रेमडेसीवीर या लसीचा पुरवठा होणे ही बाब वर्धेकरांसाठी निश्चितच अभिमानाची आहे.
राज्यात रेमडेसीवीर या लसीचा तुटवडा जाणवायला लागल्यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रेमडेसीवीर लस तयार करणार्यांचा शोध घेतला. रेमडेसीवीर ही लस तयार करणारा विदर्भातील असल्यास उत्तम असे असल्याने आपले नाव पुढे आल्याचे डॉ. क्षीरसागर म्हणाले. आम्ही वर्ध्यातील सेवाग्राम औद्योगिक वसाहतीमध्ये वर्ध्यातील भावे यांच्याकडून 2013 मध्ये युनिट विकत घेतले. त्या ठिकाणी जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रा. लि. या कंपनीमार्फत सिटी स्कॅन, एमआरआय तसेच रुग्णालयात आवश्यक असलेले क्रिटीकल स्पेअर अप इंजेक्शन तयार करण्याचे काम सुरू केले.
आता कोरोनाच्या महामारीत रेमडेसीवीर या लसीची कमतरता निर्माण झाली. रेमडेसीवीर लसीच्या तुटवड्यामुळे कोणाचाही प्राण जाऊ नये यासाठी लस तयार करणार्याचा शोध केंद्रीय मंत्री गडकरी यांचा सुरू होता. रेमडेसीवीरची कमतरता असल्याने राज्यात युनिट उभे व्हावे त्यातही तो विदर्भातील असेल तर उत्तम याची चर्चा सुरू असतानाच आमच्या कंपनीचे नाव ना. गडकरी यांना कळले. त्यानंतर त्यांनी आम्हाला बोलावत लस तयार करण्यासंदर्भात चर्चा केली. आम्ही त्याला होकारही दिला असल्याचे डॉ. क्षीरसागर म्हणाले. लस तयार करण्यासाठीचा परवाना, कच्चा मालाचा तुटवाडा असल्याने तो मिळाल्यनंतर लस निर्मितीच्या कामाला आम्ही प्रारंभ करू, असे डॉ. क्षीरसागर म्हणाले. तुटवड्याच्या काळात रेमडेसीवीर लस तयार करण्याची संधी मिळणे हे फार महत्त्वाचे ठरणार असल्याचे डॉ. क्षीरसागर म्हणाले.
![](https://vishwbharat.com/wp-content/uploads/2021/04/6-3-600x330.jpg)