नागरिकांना आरामदायक व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्ग निर्माण करण्यात येत आहे. ११ डिसेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी पहिल्या टप्याचा लोकार्पण सोहळा पार पडला.
सदर मार्ग नागरिकांच्या प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी एसटी महामंडळाकडून १५ डिसेंबर पासून नागपूर ते शिर्डी या मार्गावर आसनी बससेवा सुरू करण्यात येत आहे. या बसमध्ये प्रवाशांना २X१ पध्दतीची ३० आसने (पुशबॅक पध्दतीची) बसण्यासाठी उपलब्ध असून १५ शयन आसने आहेत.
तिकीट दर किती?
ही बससेवा ही नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ०९.०० वाजता सुटेल व पहाटे ०५.३० वाजता पोहचेल. या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२.५ कि.मी. व वेळेमध्ये ४.१५ तास बचत होणार आहे. या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति १३०० रूपये तर मुलांसाठी ६७० रूपये इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. तसेच ७५ वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात १००% मोफत तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५०% सवलत असणार आहे.
मुलांसाठी किती दर?
याबरोबरच नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावरही समृध्दी महामार्गाव्दारे शयन आसनी बससेवा सूरू करण्यात येत आहे. सदरची बससेवा ही नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १०.०० वाजता सुटेल व जालना मार्गे पहाटे ०५.३० वाजता पोहोचेल. सदर बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात ५०.९ कि.मी. व प्रवास वेळेमध्ये ४.४० तास इतकी बचत होणार आहे. सदर बससेवेमुळे नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी प्रति व्यक्ति ११०० रुपये व मुलांसाठी ५७५ रू. इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. तर नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रति व्यक्ति ९४५ रू. व मुलांसाठी ५०५ रू. इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.