राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड यांचा आज वाढदिवस आहे. परंतु, आपण हा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं आव्हाड यांनी जाहीर केलं आहे. तसेच ते अज्ञातस्थळी गेले आहेत, त्याचबरोबर त्यांनी त्यांचा फोनही बंद केला आहे. आज दिवसभरात ते कोणाच्याही संपर्कात नसतील, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. वाढदिवस साजरा न करता अज्ञातस्थळी जाण्याबद्दल स्वतः आव्हाड यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.
देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफूटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं असं मला अजिबात वाटत नाही. तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचे शुभाशीर्वाद आहेत. हीच माझी ताकद आहे. हीच माझी संपत्ती आहे. पण तरिही मला माफ करा. मी आज रात्री १२ वाजल्यापासून ते उद्या रात्री १२ वाजेपर्यंत स्वतःचा फोन बंद करून अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे.