भारताच्या विविध ठिकाणी खूप चवदार, चमचमीत खाद्यपदार्थ चाखायला मिळतात. प्रत्येक राज्य आणि शहरात स्वत:चा असा एक खास खाद्यपदार्थ आहे; ज्याच्या नावे ते राज्य किंवा शहरही ओळखले जाते. देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्वत्र विविध खाद्यपदार्थांमध्ये काहीतरी वेगळी खासियत पाहायला मिळते. त्यात कुठे अतिशय साधे जेवण, तर कुठे मसालेदार खाद्यपदार्थांना पसंती दिली जाते. त्यामुळे देश-विदेशांतील लोक येथे येऊन विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणयाची इच्छा व्यक्त करतात. भारतीय खाद्यपदार्थांची जगभरात अनेकदा प्रशंसा केली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की, जगातील १०० सर्वांत वाईट खाद्यपदार्थांच्या यादीत भारताच्या एका पदार्थाचा समावेश आहे. नुकतीच जगातील १०० सर्वांत वाईट खाद्यपदार्थांची यादी जाहीर झाली; त्यात बटाटा-वांग्याची भाजी जगातील सर्वांत वाईट पदार्थांच्या यादीत समाविष्ट झाली आहे. विशेष करुन महाराष्ट्रात ही भाजी आवडीने खाल्ली जाते.
बटाटा-वांग्याच्या भाजीला मिळाले सर्वांत कमी रेटिंग
अलीकडेच ‘टेस्ट अॅटलस’ नावाच्या ट्रॅव्हल गाईडने जगातील १०० सर्वांत वाईट पदार्थांची यादी जाहीर केली आहे. त्या यादीत भारतीय खाद्यपदार्थ वांगी-बटाट्याच्या भाजीला ६० व्या स्थानी ठेवण्यात आले आहे. वांगी-बटाट्याच्या भाजीला जगभरातून केवळ २.७ टक्के रेटिंग मिळाले आहे; जे खूपच कमी आहे. ही भाजी भारतात खूप लोकप्रिय आहे; पण परदेशी लोकांना तिची चव आवडली नाही. परदेशी लोकांसाठी भारतीय खाद्यपदार्थांची चव वेगळी असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते.
कोणता पदार्थ आहे नंबर १ वर
टेस्ट अॅटलसच्या रिपोर्टनुसार अग्रगण्य १०० खराब पदार्थांच्या यादीत आइसलँडची डिश ‘हकार्ल’ पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेचा रामेन बर्गर दुसऱ्या, तर इस्रायलचा जेरुसलेमी कुगेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पदार्थांना सर्वांत वाईट रेटिंग मिळाले आहे. वांगी-बटाट्याची भाजी ही एक लोकप्रिय भारतीय ग्रेव्ही डिश आहे; जी देशभरात आवडते. बटाटे, वांगी, कांदा, टोमॅटो आणि विविध प्रकारच्या मसाल्यांचा वापर करून ही भाजी बनवली जाते. तसेच हिरव्या कोथिंबीरच्या पानांनी सजवली जाते. कदाचित मसाले आणि चव यांतील फरकामुळे परदेशी लोकांना ही चव विचित्र वाटली असावी; पण ही भाजी भारतात खूप लोकप्रिय आहे.
पदार्थांना कसे दिले जाते रेटिंग?
सर्वप्रथम टेस्ट अॅटलसद्वारे जगभरात ऑनलाइन सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणातील सहभागींना १०० सर्वांत वाईट पदार्थांबद्दल त्यांचे मत देण्यास सांगितले जाते. त्यानंतर सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले जाते. प्रत्येक खाद्यपदार्थाला मिळालेले रेटिंग आणि टिप्पण्या लक्षात घेऊन संग्रहित स्कोअर तयार केला जातो.
दरम्यान, वांगी-बटाट्याची भाजी बहुतेकांना चपाती, भाकरी, रोटीबरोबर खायला आवडते. ही भाजी भारतात लोकप्रिय असून, ती खराब पदार्थांच्या यादीत समाविष्ट झाली आहे. वांगी- बटाट्याच्या भाजीला पाचपैकी केवळ २.७ एवढे रेटिंग मिळाले.