नारायण राणेंनी विनायक राऊत यांचा पराभव करत सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला. मात्र, राणेंच्या या विजयाला उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊतांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. विनायक राऊत यांच्या याचिकेनुसार, राणेंनी कपटनीती, पैशांचा वापर आणि मतदारांना धमकावून हा विजय मिळवला आहे. राऊतांनी आरोप केला की, राणे, त्यांचे पुत्र नीतेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राऊतांच्या याचिकेत म्हटले आहे की, निवडणूक काळात अनेक गैरप्रकार झाल्याचे नमुद केले आहे.
नारायण राणेचे चिरंजीव नितेश राणे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केल्याचा आरोपही विनायक राऊत यांनी केला आहे. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, मात्र कारवाई झाली नाही म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. आचारसंहिता भंगाच्या प्रकारांकडे जाणूनबुजून डोळेझाक केली आणि निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्त्वाला आयोगाच्या अधिका-यांनी हरताळ फासल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.
निवडणूक प्रचार कालावधी ५ मे २०२४ रोजी संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते ६ मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करीत होते, नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतांनाही ई.व्ही.एम.मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे या याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, मतदारांना पैसे देऊन राणे साहेबांना मत द्यायला सांगितले जात होते. नीतेश राणे यांनी जाहीर सभेत मतदारांना धमकावले की, “राणे साहेबांना लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी मिळणार नाही.” या सर्व आरोपांवर आधारीत याचिकेत निवडणूक रद्द करून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. राणेंच्या विजयावर आरोप गंभीर असून, न्यायालयाचा निर्णय काय येतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याचिका दाखल करण्यामागील मुख्य कारण म्हणजे निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करणे, असे राऊतांचे म्हणणे आहे.