वीज पडून शेतकर्याचा मृत्यू
– अंमलनाला धरणाजवळ दगावल्या 25 गायी
चंद्रपूर,
बेपत्ता झालेल्या पावसाने बुधवारी तालुक्यात मेघगर्जनेसह दुपारी 2 वाजताच्या सुमारास हजेरी लावली. दरम्यान, वीज पडून खिर्डी शिवारात लक्कडकोट येथील 45 वर्षीय शेतकर्याचा मृत्यू झाला. वारलू रामटेके असे मृतक शेतकर्याचे नाव आहे.
दरम्यान, कोरपना तालुक्यातील अंमलनाला प्रकल्पाजवळ 20-25 गायींचा मृत्यूमुखी पडल्या. त्या पाण्यात तरंगताना दिसल्या. तेव्हा वीज कडाडली आणि मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे या गायींचा मृत्यूदेखील वीज पडून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नेमका या गायींचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत वृत्तलिहिस्तोवर माहिती कळू शकली नाही. या सर्व गायी मानोली येथील आहेत. या गायी धरणाजवळ चरत होत्या.
वारलू रामटेके आपल्या शेतात काम करीत होते. दुपारच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी जात असताना वीज कोसळली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती नागरिकांनी पोलिस व महसूल प्रशासनाला दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.