नागपूर, अमरावती, अकोला यासह अनेक शहरातील प्रमुख वर्दळीच्या विविध भागातील रस्त्यांवर उठणाऱ्या धुळीच्या लोटांमुळे दुचाकीस्वार, वाहनचालक आणि रस्त्याच्या शेजारी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये आरोग्याच्या तक्रारी समोर येत आहे.
सततच्या धुळीमुळे दमा, शिंका येणे, अंगावर पुरळ येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांची आग होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
काय करावे?
विविध शहरातून बाहेर जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी धूळ साचली आहे. दुभाजकांलगतही धूळ साचलेली असल्याने अवजड वाहनांमुळे अनेकदा धुळीचे लोट उठतात. त्यामुळे वाहनचालक याशिवाय रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो. हिवाळ्यात हवेत धुळीचे प्रमाण जास्त असल्याने खबरदारी घेणे आवश्यक असते. खासकरून चेहऱ्यावर नाक आणि कान झाकले जातील अशा रितीने स्कार्फ, रुमाल बांधून प्रवास करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले. एक ते दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ सातत्याने धुळीशी संपर्क येत असल्यास श्वसन संस्थेसंबंधातील विविध आजार जडत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टर्स नोंदवतात.
धुळीमुळे प्रदूषणात वाढ
डॉक्टरांच्या मते सध्या डस्ट अॅलर्जीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसते. वातावरणातील बदल, धूळ, धूर, वातावरणातील मायक्रो पार्टिकल्स यामुळे प्रदूषणात वाढ होत असून डस्ट अॅलर्जीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नाक वाहणे, शिंका येणे, डोळ्यातून पाणी येणे, सर्दी-खोकला होणे आदी तक्रारी आढळतात. अनेकांमध्ये त्वचाविकार, केस गळणेही दिसून येत आहे.
धुळीपासून वाचण्यासाठी
वाहनचालकांनी मास्क, रुमाल, गॉगलचा वापर करावा. रस्त्यानजीकच्या व्यावसायिक विक्रेत्यांनी धुळ दुकानात येणार नाही यासाठी प्लास्टिक स्क्रीन लावावी. स्वच्छ पाण्याने डोळे धुवावे.श्वसनसंस्थेसंदर्भात त्रास होत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.
विश्वभारत News Website