औरंगाबाद महामार्गवरील हॉटेल मिरची चौकात झालेल्या अपघातानंतर महापालिकेने उड्डाणपुलाची गरज व्यक्त केली होती. मात्र, आधी नकार दिल्यानंतर आता या विषयावर सार्वजनिक बांधकाम विभागाने यू-टर्न घेत स्वतःहून शासनाकडे तीन उड्डाणपूलांची आवश्यकता असल्याचे सांगत प्रस्ताव सादर केला आहे.
त्यानुसार शासनाने मंजुरी दिल्यास हॉटेल मिरची चौक, सिद्धिविनायक लॉन्स चौक व नांदूर नाका चौक यातील ठिकाणी औरंगाबाद महामार्गावर नाशकात उड्डाण पुल दिसेल.
ऑक्टोबर महिन्यात औरंगाबाद महामार्गावरील मिरची हॉटेल चौकात एका खाजगी ट्रॅव्हल बस व ट्रकच्या अपघातात बसला आग लागत बारा जणांचा मृत्यू झाला होता तर 48 प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गावरील वाहतुकी संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपूल तयार करावे, अशी मागणी केली. परंतु महानगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर उड्डाणपूल किंवा अन्य उपाययोजना करण्याची जबाबदारी महापालिकेची किंवा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची असल्याचा दावा करत सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात काम करण्यास अप्रत्यक्ष नकार दिला. राज्याचे सचिव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वर करीत निधीच्या कमतरतेचे देखील कारण दिले. महापालिकेने महामार्गावरील अपघाताची गंभीर बाब लक्षात घेता शासनाकडे देखील उड्डाणपूलांसाठी पाठपुरावा केला. आता या विषयावरून सार्वजनिक बांधकाम विभागाने टर्म घेत औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिरची चौक सिद्धिविनायक लॉन्स चौक व नांदूर नाका चौक या तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव मंत्रालयात सचिवांना सादर केला.