बीडच्या गेवराई तालुक्यात वाळुमाफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच आहे.आता त्यांच्यापासून माझ्या जीवाला व कुटुंबियांना धोका आहे. मला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी गेवराईच्या तहसिलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
यावरून गेवराई तालुक्यात वाळुमाफियांची दशहत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.तहसीलदार सचिन खाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हणलंय, की मी आमच्या कर्मचाऱ्यांसह जाऊन सावरगाव गेवराई,येथे अवैध वाळू साठ्यावर कारवाई केली. यात दहा ट्रॅक्टरसह केनी, वाळुसाठा जप्त केला. या कारवाईमुळे वाळुमाफिया मला त्रास देण्याच्या विचारात असल्याचे दिसत असून त्यांच्यापासून मला व माझ्या कुटुंबियांना त्रास होण्याची शक्यता आहे. याआधीही वाळुमाफियांकडून मला त्रास झालेला आहे.
याबरोबरच मी घरी असतानाही वाळूमाफियांची माणसे माझ्या मागावर असतात. मी अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी घरातून बाहेर पडलो, की अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना माहिती देतात. त्यामुळे मला कारवाईही करता येत नाही, असे म्हणत त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत अहवाल मागवला असून कारवाईची मोहीम उघडलेल्या तहसिलदार सचिन खाडेंना संरक्षण मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या अगोरदही वाळू माफियांनी अधिकाऱ्यांवर हल्ले केले आहेत. तर कित्येक नागरिकांना चिरडले देखील आहे. त्यामुळं या वाळू माफियांचा बंदोबस्त करावा. अशी देखील मागणी नागरिकांमधून होत आहे.