“ई-चावडी, ई-फेरफार, ई-पंचनामा नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी होत आहे. मात्र, ई-स्पोर्ट्स होऊ नये. खेळ प्रत्यक्षात मैदानातच खेळावे. कामाच्या व्यापातून खेळामार्फत मानसिक आणि शारीरिक विरंगुळा मिळावा,”असे प्रतिपादन नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या समारोपीय भाषणात मानकापूर येथे डॉ. विपीन बोलत होते. अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त प्रसन्ना बिरारी उपस्थित होत्या. या प्रसंगी गोंदिया जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा, गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीना, नागपुरच्या अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, उपाआयुक्त (करमणूक)चंद्रभान पराते,निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर उपस्थित होत्या. गडचिरोलीचे तहसीलदार आणि क्रिकेटचे प्रशिक्षक मोहन टिकले, मौदाचे तहसीलदार मलिक विराणी, कामठीचे तहसीलदार अक्षय पोयाम,सावनेरचे तहसीलदार प्रताप वाघमारे, पारशिवनीचे तहसीलदार प्रशांत सांगडे, नागपूर ग्रामीणचे तहसीलदार वानखेडे आदीनी आपापल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविला.
जिल्हाधिकारी म्हणाले, “दरवर्षी अशा क्रीडा स्पर्धा आवश्यक आहे. यातून महसूली कामकाजातही सुधारणा होते. स्पर्धेत एकूण 81 खेळ खेळण्यात आले.
नागपूर पथसंचलनात अव्वल
सर्वाधिक बक्षीस गडचिरोली जिल्ह्याला मिळाले. तर, नागपूर जिल्ह्याने पथसंचलनात प्रथम, खो-खो मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. सांस्कृतिक कार्यक्रमातही अनेकांनी सहभाग घेतला.
राज्यस्तरीय स्पर्धा औरंगाबादला
राज्यस्तरीय स्पर्धा येत्या काळात औरंगाबाद येथे होणार आहे. तर, विभागीय स्पर्धा चंद्रपूर येथे पुढील वर्षी आयोजित करण्यात येतील.