बिपरजॉय चक्रीवादाळामुळे मान्सून चांगलाच प्रभावित झाला. मान्सूनच जूनच्या अखेरीस आगमन झालं आहे. हवामान विभागाकडून 27 जूनला राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून दोन दिवसांपूर्वी वर्तवण्यात आला होता.
आता पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनीही पेरणीची लगबग सुरू केली आहे. पेरणीआधी कृषी आयुक्तांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
कृषी आयुक्तांचे काय आहे आवाहन?
21 जूनपर्यंत पावसाचे प्रमाण कमी असून आता पावसाला सुरवात झाली आहे. आतापर्यंत यंदा सरासरीच्या 25 टक्के पाऊस झाला आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत फारच कमी पाऊस पडला आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 47 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पण जोपर्यंत जमीन पुर्णतः ओली होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. वेधशाळेचे अंदाजही सकारात्मक आहे. नाशिक आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण अजूनही कमी आहे. बाजारात मुबलक प्रमाणात खते, बियाणे, कीटकनाशके उपलब्ध आहे. बी-बियाणे मिळवण्यात अडचणी येत असतील तर संपर्क साधा, असं आवाहनही कृषी आयुक्त चव्हाण यांनी केले आहे.