मराठवाड्यात वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे सुरु केला होता. या सर्व्हेनंतर त्यांनी खरीप आणि रब्बी दोन हंगामाच्या सुरवातीला पेरणीसाठी शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी दहा हजार एकरी मदत करण्याचा निकष काढला होता.
यासंदर्भात रिपोर्टही सरकारकडे पाठवला होता. मात्र त्यांच्या या भुमिकेमुळे सरकार आणि सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा रंगली आहे.
धडाकेबाज कारकीर्द
राज्यातील काही मोजक्या आणि संवेदनशील,धडाकेबाज आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीत सुनील केंद्रेकरांचे नाव अव्वल स्थानी असते. विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त आणि आता विभागीय आयुक्त पदावर त्यांनी काम केले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्यात केंद्रेकर नेहमी चर्चेत राहिले आहेत.
बीडचे जिल्हाधिकारी असताना त्यांची बदली झाली आणि अख्खा बीड जिल्हा त्यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला होता. शेतकरी कुटुंबातून आलेल्या केंद्रेकरांनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या उपयोजना राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा धडाकेबाज आयएएस अधिकाऱ्याने अचानक स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज का घेतला असेल याचे उत्तर मात्र अजूनही मिळाले नाही.
विश्वभारत News Website