राज्यांत पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू, मलेरिया, डायरिया, लेप्टोस्पायरोसिस यासारखे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या ऋतुत आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे या दिवसांत निरोगी राहण्यासाठी जाणून घेऊया, आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला !
– पाऊस पडायला सुरुवात झाली की, नियमित पाणी उकळून प्यावे. यामुळे पाण्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात. याशिवाय दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून हे पाणी प्यायल्याने शरीरातील हानीकारक विषाणू आणि विषारी द्रव्ये शरीराबाहेर पडायला मदत होते.
– पावसाळ्यात आहारात मिठाचे प्रमाण कमी करावे. चवीनुसार आवश्यक तेवढेच मीठ खावे. मीठ शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढवण्याचे काम करते. त्यामुळे भविष्यात यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. हायपरटेंशन, कार्डियोवस्क्यूलर डिसीज आणि मधुमेह यासारखे आजार असणाऱ्या रुग्णांनी आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे.
– ऋतुमानानुसार फळांचे सेवन करावे. पावसाळ्यात पपई, जांभूळ, बेर, सफरचंद, डाळींब, नाशपती, अळू ही फळे खाऊ शकता. या फळांद्वारे शरीराला पोषक द्रव्ये मिळाल्याने संसर्ग, अॅलर्जी आणि इतर सामान्य आजारांपासून दूर राहायला मदत होते.
– या दिवसांत रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घ्यावा. यासाठी सुकामेवा, भोपळा, भाज्यांचे सूप, बिटरूट, टोफू हे पदार्थ खावेत. याव्यतिरिक्त दररोज 7 ते 8 तासांची झोप घेणेही आवश्यक आहे.
– पावसाळ्याच्या दिवसांत स्ट्रीट फूड खाण्याची इच्छा होते. तरीही या दिवसांत तब्येतीची काळजी घेण्याकरिता बाहेरचे खाणे टाळावे. बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. अनेक वेळा उघडे ठेवलेले किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो.
– कच्चे अन्नपदार्थ या दिवसांत खाऊ नयेत. या दिवसांत चयापचय क्रिया मंदावते. यामुळे अन्नपचन उशिरा होते. त्यामुळे या दिवसांत बाहेर विकत मिळणारे ज्यूस, सलाड खाणे टाळावे. बराच वेळ कापून ठेवलेली फळेही खाऊ नयेत.
विश्वभारत News Website