समृद्धी महामार्गावर अपघात झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सची पीयुसी अपघातानंतर काढण्यात आली होती.ही बाब तपासादरम्यान उघडकीस आली होती. या प्रकरणात पीयूसी देणाऱ्या रॉयल पीयुसी सेंटरचा परवाना उपप्रादेशिक परिवहन विभागाने अखेर रद्द केला आहे.
इतकेच नव्हे तर ट्रॅव्हल्स मालक महिलेच्या पोलिस उपनिरिक्षक पतीचा जबाबही या प्रकरणात नोंदवण्यात आला आहे.
नागपूर येथून पुण्याकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच २९ बीई १८१९ चा समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा जवळ भीषण अपघात झाला. त्यात अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सने पेट घेऊन तब्बल २५ प्रवाशांचा जागेवरच कोळसा झाला. ३० जून रोजी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेनंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने ट्रॅव्हल्सच्या कागदपत्रांची आणि इतर बाबींची तपासणी सुरू केली. त्यात प्राथमिक चौकशीमध्ये केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीत अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सची पीयुसी ३० जुन २०२३ रोजी वैध नसल्याचे आढळून आले होते.
मात्र त्यानंतर ४ जुलै रोजी शासनाच्या एम-परिवहन अॅपवर पीयुसी ३० जुन २०२४ पर्यंत वैध असल्याचे दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही पीयुसी १ जुलै रोजी काढण्यात आल्याचे पुढे आले आहे. वाहनाची पीयुसी काढण्यासाठी वाहन पीयुसी केंद्रावर नेऊन तपासणी करणे आवश्यक असते. असे असताना ३० जूनच्या मध्यरात्रीनंतर अपघातात जळालेल्या ट्रॅव्हल्सची पीयुसी १ जुलै रोजी काढलीच कशी हा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, उपविभागीय प्रादेशीक परिवहन अधिकारी कार्यालयाने या प्रकरणात चौकशी सुरू करुन ही पीयुसी देणाऱ्या रॉयल पीयुसी केंद्र चालकाला व ट्रॅव्हल्सच्या मालकालाही नोटीस दिली होती.
त्या दोघांना जबाब नोंदवण्यासाठी बुधवारी पाचारण करण्यात आले होते. मात्र पीयुसी केंद्र चालक हजर न झाल्याने तातडीने कारवाई करीत त्याच्या पीयुसी सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला. तर ट्रॅव्हल्स मालक प्रगती दरणे यांची प्रकृती ठिक नसल्याचे कारण सांगत त्यांच्या वतीने त्यांचे पती पोलिस उपनिरिक्षक भास्कर दरणे यांनी कार्यालयात जावुन जबाब नोंदवीला. अपघातानंतर पीयुसी देणाऱ्या केंद्र चालकावर कारवाई करण्यात आली. आता ती पीसयुसी काढणाऱ्या ट्रॅव्हल्स मालकावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सेंटरच्या तपासणीकडे दुर्लक्ष
एखाद्याला पीयुसी सेंटर सुरू करायचे असल्यास पार्कींगची प्रशस्त जागा,आवश्यक उपकरणे आणि इतर बाबी असणे आवश्यक आहे.ही बाब लक्षात घेऊन पीयुसीसाठी अर्ज करणारे परवाना मिळण्यासाठी त्या सर्व बाबींची पूर्तता करतात.मात्र एकदा परवाना मिळाला की,त्यानंतर पीयुसी सेंटर सोईच्या ठिकाणी किंवा चक्क आरटीओ कार्यालयासमोर हलवण्यात येते. मात्र परवाना दिल्यानंतर या सेंटरच्या नियमीत तपासणीकडे दुर्लक्ष होत असल्याने या बाबी उघडकीस येत नाही किंवा त्याकडे कुणी गांभीर्याने लक्षही देत नाही.त्याचाच फायदा या सेंटर चालकाकडून घेण्यात येताना दिसत आहे.