लातूर जिल्ह्यातल्या जेवरी शिवारात चक्क गायरान जमिनीवरच पिक विमा उतरवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातल्या दोघांनी मिळून पिक नसलेल्या गायरान जमिनीवर हा विमा उतरवला आहे. उपजिल्हाधिकारी यांनी आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पिक विम्याच्या बाबतीत फसवेगिरी काही नवीन विषय नाही. मात्र शासनाने एक रुपयात पिक विम्याची योजना जाहीर केली. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा; याची जनजागृती सुरू केली. या योजनेचा लाभही शेतकरी घेताना दिसत आहेत. मात्र यावर्षीच्या खरीप पिक विमा भरण्यामध्ये सुद्धा मोठी फसवेगिरी समोर आली आहे. चक्क गायरान जमिनीचा पिक विमा उतरल्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. जवळपास ३० एकर क्षेत्रावरील गायरान जमिनीचा विमा बीडच्या दोन भामट्यांनी काढल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला.
सोयाबीन, भाताची लागवड दाखविली
लातूरच्या जेवरी या गावांतील सर्व्हे नंबर २२ मधली ३० एकर गायराण जमिनीवर ४ हेक्टर सोयाबीन आणि भात तर दुसऱ्या ८ हेक्टर वरती सोयाबीन आणि भात लागवड केला असे दाखवत विमा उतरवला. ही, घटना जेवरी या गावात राहणाऱ्या संभाजी तारे यांच्या लक्षात आली. त्यांनी निलंगा इथल्या उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्या लक्षात आणून दिली. यानंतर शोभा जाधव यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. मात्र विमा भरणारे दोन्ही व्यक्ती हे बीड जिल्ह्यात राहत असल्याचे पावतीवरून लक्षात येत आहे. उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी आमच्याकडे तोंडी तक्रार दाखल झाली असून पिक विमा भरलेल्या पावत्या प्राप्त झाल्या. कृषी विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.