उत्तर मुंबई मतदारसंघाचे विद्यामान खासदार गोपाळ शेट्टी यांनी मोदींची ईडीकडून चौकशी झाली होती असं सांगितलं. मोदींना अटकेची भीती नसल्याने ते ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते. विरोधकांनी खरं काही केलं नसेल तर त्यांना चौकशीला सामोरे जाण्यात काय अडचण आहे? असा थेट सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. “पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांना 9 तास ईडी कार्यालयात बसवून ठेवण्यात आलेलं. 9 तासाच्या चौकशीदरम्यान त्यांनी सर्वच प्रश्नांची उत्तरं दिली होती. माध्यमे ही बातमी आता दाखवत नाहीत. मात्र हे सत्य आहे,” असं गोपाळ शेट्टी म्हणाले. विशेष म्हणजे गोपाळ शेट्टी यांना यंदा उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी यंदा पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
“विरोधक काहीही बोलले तरी त्याला फारसं महत्त्व नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. देशाच्या संविधानाने हे अनेकदा दाखवून दिलं आहे. भविष्यात सर्वांवर संविधानाचा धाक राहिला पाहिजे. मी आमदार, खासदार, मुख्यमंत्री असल्याने वाटेल ते करेन. मला कोणीही काहीही विचारणार नाही असं उद्या कोणीही म्हणू शकतं. असं झाल्यास कायदा फक्त गरिबांसाठी आहे का? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो,” असंही शेट्टी यांनी म्हटलं. सध्या पक्षाकडून खासदारकीचं तिकीट नाकारण्यात आल्याने शेट्टी त्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी मिळेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा प्रचार करत आहेत.