गेल्या अनेक दिवसांपासून भारत चीनदरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. त्यानंतर अद्यापही दोन्ही देशांमधील तणाव निवळलेला नाही. एकीकडे चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहेत. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधील ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याची माहिती आता समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार निनाँग एरिंग यांनी हा दावा केला आहे. त्यांनी आज यासंदर्भातील ट्विट करत माहिती दिली आहे.
“सुबनसिरी जिल्ह्यातील ५ लोकांचं कथितरित्या पीएलएनं अपहरण केलं आहे. पाच महिन्यांपूर्वीही अशी घटना घडली होती,” असं एरिंग म्हणाले. तसंच पीएलए आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला याचं सडेतोड उत्तर दिलं गेलं पाहिजे, असंही ते म्हणाले. त्यांनी आपल्या ट्विटसोबत ज्या लोकांचं अपहरण करण्यात आलं त्यांची नावंदेखील दिली आहेत.
अपहरण करण्यात आलेले पाच जण हे तागिन समुदायाशी संबंधित आहेत. ते जंगलात शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी चिनी सैन्यानं त्यांचं अपहरण केल्या ‘द अरूणाचल टाईम्स’नं म्हटलं आहे. टोच सिंगकम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू एबिया, तनु बाकेर आणि गारू डिरी अशी अपहरण करण्यात आलेल्यांची नावं एका व्यक्तीच्या असल्याचं त्यांच्या नातेवाईकाकडून सांगण्यात आलं. तसंच या पाच जणांसोबत आणि दोन जण त्या ठिकाणी उपस्थित होतं. परंतु अपहरणापूर्वी त्या ठिकाणाहून पळून जाण्यात ते यशस्वी ठरले. त्यांनीच याची माहिती दिल्याचं सांगण्यात येत आहे.