चंद्रपूर, ता. ८ : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद बगीच्याच्या नूतनीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम युद्धस्तरावर पूर्ण करण्याच्या सूचना महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिल्या.
मंगळवार, ता. ८ जून रोजी सायंकाळी पाच वाजता महापौरांनी बगिच्यात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर यांची उपस्थिती होती.
महात्मा गांधी मार्गावर अगदी शहराच्या हृदयस्थळी आझाद बगिचा आहे. या बगिचात दररोज हजारो नागरिक येतात. पहाटेपासूनच नागरिकांची या बागेत वर्दळ सुरू होते. सायंकाळीही नागरिक मोकळ्या हवेत फिरायला या बागेत येतात. विशेष म्हणजे, वयोवृध्द व बालगोपालही या बागेत येतात. त्यासाठी आझाद बागेचे सौंदर्यीकरण करून बालगोपाल, वयस्क, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा आणि फिरण्याची व्यवस्था केली जात आहे. काही ठिकाणी हिरवळ, प्रवेशद्वार, खेळणे आणि बसण्यासाठी आसने लावण्यात येत आहेत. ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी अधिका-यांना दिल्या.