पोंभुर्णा ग्रामीण रूग्णालयाचे काम 30 दिवसात पूर्ण करा
– आ. मुनगंटीवारांचे शासकीय अधिकार्यांना निर्देश
चंद्रपूर,
पोंभुर्णा येथे 30 खाटांच्या नविन ग्रामीण रूग्णालयास काही वर्षापूर्वी मान्यता मिळाल्यानंतर हे रूग्णालय नागरिकांच्या सेवेत रूजू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता येत्या 30 दिवसात पूर्ण करा, असे निर्देश संबंधित अधिकार्यांना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी झालेल्या आभासी बैठकीद्वारे दिले.
या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भास्करवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम, जिल्हा परिषद सदस्य राहूल संतोषवार, पंचायत समिती उपसभापती ज्योती बुरांडे, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, भाजपा नेते गंगाधर मडावी, श्वेता वनकर, शारदा कोडापे, ईश्वर नैताम, विजय कस्तुरे, मोहन चलाख, सुनिता मॅकलवार, पुष्पा बुरांडे, नेहा बघेल यांची उपस्थिती होती.
आ. मुनगंटीवार म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरीही कोरोनाचा धोका टळलेला नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना ही लाट चिमुकल्यांना आपल्या कवेत घेणार आहे. त्यामुळे तातडीने पोंभुर्णा येथील नवनिर्मीत ग्रामीण रूग्णालय कार्यान्वित करणे गरजेचे आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी, या रूग्णालयात पदभरती करण्यासंदर्भात कारवाई सुरू असल्याचे सांगितले. ग्रामीण रूग्णालय पोंभुर्णा येथील वैद्यकीय अधीक्षक यांना संवितरण अधिकारी घोषित करण्यात आले आहे.
या रूग्णालयात आरोग्य सुविधा पुरविण्याकरिता 97.43 लाखाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून, यातून साहित्य सामुग्री, यंत्र सामुग्री, वैद्यकीय उपकरणे पुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे ते म्हणाले. याचवेळी डॉ. राठोड यांनी, ग्रामीण रूग्णालयाच्या सेवेतील 15 काल्पनिक पदभरतीची जाहीरात 4 जूनला प्रकाशित केल्याचे सांगितले. भास्करवार यांनी, आरोग्य संस्थेची बांधकामे पूर्ण झाल्यावर ताबा पावती घेताना घ्यावयाच्या नाहरकत प्रमाणपत्राबाबत माहिती दिली. यावर आ. मुनगंटीवार यांनी वैद्यकीय अधिकार्यांसाठी आवश्यक असलेल्या निवासस्थानांचे बांधकाम व इतर सर्व कामे 30 दिवसांच्या आत पूर्ण करून 30 खाटांचे नवनिर्मित ग्रामीण रूग्णालय नागरिकांच्या सेवेत रूजू करा, असे निर्देश दिल्याने ग्रामीण भागातील जनतेची आरोग्य सेवेसाठीची प्रतिक्षा आता संपणार आहे.