विश्व भारत ऑनलाईन :
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागणडोह येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला. परिणामी,वस्तीतील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पश्चिम बंगाल येथून आलेले सहा जणांचे हत्ती नियंत्रक पथक आणि वन विभागाची रेस्क्यू टीम याच परिसरात शुकवारी सकाळपासूनच तळ ठोकून आहे.
नागणडोह येथील घटनस्थळी सहायक उवनसंरक्षक दादा राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही़ पी. तेलंग, वनक्षेत्र सहायक एफ.सी. शेंडे, ए़.जी. माहुले यांनी भेट दिली. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत़.वनविभागाने या गावकऱ्यांना चार-पाच दिवस गावात न जाण्याचे निर्देश दिले. दरम्यान, नागणडोह येथील वस्तीतील नागरिकांनी घरात मोहफुलांचा साठा करून ठेवला होता. या मोहामुळेच हत्तींनी वस्तीत प्रवेश करुन नासधूस केल्याची माहिती आहे.
नागणडोह परिसरातील हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना वन विभागाने केल्या आहेत.
विश्वभारत News Website