गोवंशाची तस्करी करणारे तीन ट्रक ताब्यात– 82 जनावरांची सुटका,– 7 जण अटकेत
मूल,
नागभीड-मूल-गोंडपिपरीमार्गे तेलंगणा राज्यात जनावरांची तस्करी करणारे तीन ट्रक पाठलाग करून पकडण्यात पोलिस विभागाला यश आले आहे. तब्बल 82 जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी 50 लाखांच्या तीन वाहनांसह 8 लाख 20 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला गेला. तर 7 जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी रात्री केली गेली. तीन ट्रकमधून जनावरांची तस्करी केली जात असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांना मिळाली.
माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी अधिनस्त कर्मचार्यांची दोन पथके तयार केले. नाकाबंदी करून संशयित ट्रकची तपासणी करण्यात आली असता एम. एच. 40-बीएल-8352 क्रमांकाच्या ट्रकमध्ये 23 जनावरे आढळली. या प्रकरणी भंडारा जिल्ह्यातील मोहम्मद तौसीफ मतीन शेख याच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर, दोन ट्रक नागभीडकडे परत जात असल्याची माहिती पथकाला मिळाली.
माहितीच्या आधारे त्या दोन्ही ट्रकचा पाठलाग केला. पण, तस्करांनी पोलिसांच्या वाहनाला समोर जाऊच दिले नाही. नागभीड पोलिसांना याबाबतची माहिती दिली गेली. पोलिसांनी ब्रम्हपुरी-नागभीड टी-पाईंटवर नाकाबंदी करून रात्री 2 वाजता दोन्ही ट्रकला पकडण्यात यश आले. या प्रकरणी ट्रक चालक शाहीद हुसेन अफजल हुसेन, ताहीर शेख अमीन शेख या दोघांसह अन्य दोघांविरूध्द गुन्हा दाखल करून 5 लाख 90 हजार किंमतीच्या 59 जनावरांसह 40 लाख किंमतीचे दोन ट्रक ताब्यात घेतले.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अधीक्षक अनुज तारे यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक माणिक कुमरे, पोलिस हवालदार तानु रायपूरे, वाल्मिक मेश्राम, महेश पतरंगे, नरेंद्र अंडेलकर, प्रभाकर गेडाम आणि विजय जिवतोडे यांनी केली.
विश्वभारत News Website