विश्व भारत ऑनलाईन :
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडच्या पिशोर आणि सोयगावच्या तालुक्यातील बनोटी भागात ढगफुटीदृश्य मुसळधार पाऊस झाल्याने पुर्णा – नेवपुर, अंजना-पळशी, वाघदरा यासह परिसरातील छोटी पाझर तलाव ओसंडून वाहत आहेत. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.
सोयगाव तालुक्यातील बनोटी, किन्ही, वडगाव, दस्तापूर, गोंदेगाव,उप्पलखेडा, मोहळाई भागात कापुस आणि अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
अंजना -पळशी नदिपात्रातील पिशोर – कोळंबी रस्त्यावरील पुलावरून पाण्याचा मोठा ओघ चालु असल्यामुळे कन्नड तालुक्यातील कोळंबी,भारंबा, भारंबा तांडा, पळशी, माळेगाव ठोकळ, लोखंडी माळेगाव, साळेगाव, साळेगाव तांडा, जैतखेडा या गावांचा संपर्क तुटला आहे.
अंजना-पळशी, पुर्णा-नेवपुर, वाघदरा हे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे अंजना नदी पात्राला पाण्याची आवक चालू झाले आहे. पावसाची स्थिती अशीच राहिली तर तालुक्यातील घाटमाथ्यावरील जवळपास सर्वच मध्यम व लघु प्रकल्प दोन दिवसात ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदीकाठी असलेल्या नागरिकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहे.
शिवना टाकळीचा एक दरवाजा उघडला
तालुक्यातील सर्वात मोठा असलेला शिवना टाकळी मध्यम प्रकल्प सकाळी सहा वाजता 100 टक्के भरला. त्यामुळे धरणाच्या पाच दरवाज्यापैकी तीन दरवाजे 10 से.मी उघडले. 1150 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजव्या कालव्यातून देखील 50 क्युसेक्स पाण्याचा होतोय विसर्ग सुरू. शिवना नदी काठावरील लोकांना पुढे पुराचा धोका लक्षात घेता सावधानतेचा इशारा शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाच्या वतीने देण्यात आला आहे.
जलपुजन करुन उघडला दरवाजा
शिवना टाकळी प्रकल्प पुर्णक्षमतेने भरल्याने लव्हाळी-टाकळी येथील श्रीकृष्ण आश्रमाचे मठाधिपती महंत श्री स्वामी रामेश्वरानंदजी महाराज यांच्या हस्ते आज सकाळी जलपूजन करुन शिवना नदीपात्रात एका दरवाजाद्वारे विसर्ग करण्यात आला.
पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान
तालुक्यातील चापानेर, देवगाव रंगारी, चिकलठाण, चिंचोली लिंबाजी, कन्नड, पिशोर, नाचनवेल, आठ हि महसुल मंडळात गेल्या आठ दिवसापासून सतत धारा सह वादळी वारा-यासह पाऊस सुरू असल्याने मका, कपाशी, सोयाबीन पिक जमिनदोस्त झाली आहे.
अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने कपाशीचे पिके पिवळी पडली असुन काही ठिकाणी तर मोठ मोठी कपाशीची उभी झाडे अचानक सुकू लागली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे. गोगल गाय, बोंडअळी, लाल्यारोग यासारख्या अनेक रोगांनी शेतकरी अधिच मेटाकुटीला आला आहे. त्यात गेल्या आठ दिवसापासून तालुक्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस सुरु असल्याने शेतक-यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर महसूल विभागाने पंचनामे करावे, अशी मागणी होत आहे.