विश्व भारत ऑनलाईन :
केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला पुढील ३ महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. यामुळे गरजूंना पुढील तीन महिने मोफत रेशन मिळणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. कोरोना काळात २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेंतर्गत सुमारे ८० कोटी लाभार्थ्यांना ५ किलो धान्य मोफत मिळते.
मार्च २०२२ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने अशाच प्रकारे या योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा या योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. देशात कोरोना संक्रमणानंतर नरेंद्र मोदी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर वेळोवेळी या योजनेचा विस्तार करण्यात आला.
गरीब कल्याण अन्न योजनेतर्गंत प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला ५ किलो गहू अथवा तांदूळ आणि १ किलो हरभरा मोफत दिला जातो. हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आधीच उपलब्ध केलेल्या अनुदानित रेशनच्या अतिरिक्त धान्य पुरवठा आहे.
अनियमित पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भात पेरणी सुमारे ६ टक्क्यांनी कमी झाली आहे. भात पेरणी ३६७.५५ लाख हेक्टरवर झाली आहे. अशा परिस्थितीत कोणतेही धान्यवाटप सध्याच्या बफर स्टॉकमधून केले जाणार आहे. दरम्यान, अन्नधान्याचा बफर स्टॉक कमी होत असल्याची सरकारला चिंता होती. पण तरीही मोफत रेशन धान्य पुरवठा सुरुच ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.