बेलाची पाने शंकराला वाहिली जातात. बेलाच्या पानात अर्थात माता पार्वती असते, असे जाणकार सांगतात.
कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मातृलिंगावर वाहिलेली बेलाची पाने आता थेट इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांच्याकडे जाणार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या सुधा मूर्ती या जावयाला कार्तिक पौर्णिमेची ही भेट देणार आहेत. अंबाबाईवर अपार श्रद्धा असलेल्या सुधा मूर्ती यांनी सोमवारी अत्यंत साधेपणाने देवीचे दर्शन घेतले. यानंतर काही काळ त्या बालपणीच्या कोल्हापुरातील आठवणींत हरवून गेल्या.
बालपण कोल्हापुरात घालवलेल्या सुधा मूर्ती यांची करवीर निवासिनी श्री अंबाबाईवर अपार श्रद्धा आहे. यामुळे या परिसरात त्या आल्या की, अंबाबाई दर्शन घेतल्याखेरीज राहात नाहीत. सोमवारी सांगली येथील एका कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. मात्र, कोल्हापूरच्या आठवणी आणि अंबाबाईच्या दर्शनाच्या ओढीने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. त्या सकाळी नऊ वाजता कोल्हापुरात आल्या. सोबत बालपण सोबत घालवलेल्या चार मैत्रिणीही होत्या. करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भांबरे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार मनीषा माने-लोंढे याही त्यांच्या सोबत होत्या.
साधेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या सुधा मूर्ती यांनी आजही त्याची प्रचिती देत कोणताही डामडौल न करता, अत्यंत मनोभावे अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मंदिरातील मातृलिंगाचेही दर्शन घेतले. माझा जावई शिवाचा भक्त आहे. त्यांची त्यावर प्रचंड श्रद्धा आहे, असे सांगत मूर्ती यांनी मातृलिंगावरील काही बेलाची पाने आपला जावई म्हणजेच इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकरिता घेतली.
देवस्थान समितीच्या कार्यालयात समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या हस्ते त्यांचा पारंपरिक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आस्थेवाईकपणे सर्वांची चौकशीही केली. आपण तीन वर्षे तिरुपती देवस्थानवर सदस्य होतो, त्याची आठवण सांगत कोल्हापूरच्या लोकांकरिता तिरुपती देवस्थानने दररोज किमान दहा पास राखीव ठेवले पाहिजेत, तशी मागणी करा, अशी सूचना करत ‘तिरुपती’कडून अंबाबाईला शालू येतो, तुम्ही तिरुपतीला काय देता? असा सवालही त्यांनी केला. त्यावर तसे काही सुरू करता येते का पाहा, असा सल्लाही त्यांनी दिला. अंबाबाईचे दागिने जसे ठेवता, तशाच पद्धतीने देवीला नेसविण्यात आलेल्या साड्या ठेवता येतील का, याबाबतही विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
अंबाबाईच्या दर्शनानंतर त्या बालपणीच्या आठवणीत रमून गेल्या. कोल्हापुरात राहात असताना, कुरुंदवाडमध्ये असतानाच्या आठवणी त्यांनी उपस्थितांना सांगितल्या. अंबाबाईच्या दर्शनासाठी आम्ही कसे येत होतो, असे सांगत आजही ती ओढ कायम असल्याचेही त्यांनी सांगितले. रंकाळ्याला त्यांनी भेट दिली. यानंतर त्या नृसिंहवाडी आणि कुरुंदवाडकडे रवाना झाल्या.