वाहन चालविताना मोबाइल वापरल्यामुळे सन २०२१मध्ये एकूण १,९९७ रस्ते अपघात झाले. यात १,०४० लोकांना जीव गमवावा लागला, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका अहवालामधून समोर आली आहे.
लाल सिग्नल ओलांडल्यामुळे सन २०२१मध्ये ५५५ रस्ते अपघात झाले. यात २२२ लोकांना आपला जीव गमवावा लागला, असे या अहवालात म्हटले आहे. तर २०२१मध्ये खड्ड्यांमुळे एकूण ३,६२५ अपघात झाले असून, १,४८१ लोकांचा मृत्यू झाला, असेही अहवालात नमूद केले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करून रस्ते अपघातांना आळा घालण्याची गरज असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. रस्ते सुरक्षेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयाने एक बहुआयामी रणनीती तयार केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सन २०२१मध्ये देशात एकूण चार लाख १२ हजार ४३२ रस्ते अपघात झाले. यात एक लाख ५३ हजार ९७२ लोकांचा मृत्यू झाला, तर तीन लाख ८४ हजार ४४८ लोक जखमी झाले आहेत. वाहन चालविताना मोबाईलवर न बोलणे योग्य असल्याचे उपरोक्त आकडेवारीवरून दिसतंय.