नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, काही ठिकाणी रस्तेही खराब झाले आहेत. या वर्दळीच्या मार्गावरील खड्डे तत्काळ दुरुस्त करावे, खड्डे असलेल्या मार्गावरील टोलवसुली बंद करावी, अशी मागणी नागरिक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्लूडी)करीत आहेत.
नागपूर-अमरावती महामार्गावर तीन टोल नाक्यावर वाहनांची गर्दी होत असल्याने वाहनधारकांचा वेळ वाया जातो. नाक्यावरील अनेक काउंटर्स बंद असतात. त्यामुळे रांगा लागतात व स्वयंचलित यंत्रणाही अनेकवेळा काम करत नाही. वडधामनापासून तसेच, तिवसाजवळ २०-२५ मीटरच्या अंतरावर मोठे खड्डे पडले आहेत. खराब रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. टोलनाक्यावर तक्रार पुस्तिकेची मागणी केल्यास कर्मचारी गुंडांसारखे वागतात.हिंगणघाट ते पांढरकवडा हा सुमारे २५ किलोमीटर लांब रस्ता पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. टोल दिल्यानंतरही नागरिकांची गैरसोय होते, याकडे नागरिक लक्ष वेधत आहे.
टोल वसुलीबाबत स्वयंचलित प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. टोल जमा करताना एका लेनमध्ये सहाहून अधिक वाहने असल्यास बंद तिकीट काउंटर सुरू करणे आवश्यक आहे. रस्त्यावर खड्डे असल्याने अनेक ठिकाणी अपघात होण्याची भीती आहे.