केंद्रात, राज्यात सत्ता असल्याने अहंकाराने वागू नका. हा अहंकार जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नेत्यांनी कार्यकर्ते म्हणून काम करावे अन्यथा भाजपची काँग्रेससारखी स्थिती होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
शिक्षक मतदारसंघात भाजप समर्थित उमेदवाराचा पराभव, माजी नगरसेवकांच्या विरोधातील असंतोष, कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहर कार्यकारिणीची बैठक झाली.बैठकीच्या समारोपाला फडणवीस यांचे भाषण झाले.
फडणवीस काय म्हणाले…
देशात आणि राज्यात पक्षाची सत्ता आल्याने काही जणांमध्ये अहंकाराची भावना निर्माण झाल्याचे दिसते. ज्या दिवशी हा अहंकार जनतेला दिसेल त्या दिवशी ते आपल्याला झोपवल्याशिवाय राहणार नाहीत. काँग्रेस पक्ष नेत्यांचा पक्ष झाला आणि त्यानंतर कागदावरचा पक्ष झाला. मला भीती आहे की नागपूरमध्ये भाजपची हीच अवस्था होते की काय? लक्षात ठेवा, पक्ष आहे म्हणून आपण आहोत. त्यामुळे अहंकार बाजूला ठेवून कार्यकर्ते म्हणून जनतेची काम करा. जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागा. राज्य आणि केंद्र सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. पक्षात आलेल्या नवीन लोकांना सोबत घेऊन काम करावे.